भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


श्रावकसंघ 6

एके दिवशीं बुद्ध भगवान् भिक्षाटन करीत असतां भारद्वाज ब्राह्मणाच्या शेतावर गेला. तेथे भारद्वाज ब्राह्मण आपल्या मजुरांना जेवण देत होता.  भगवान् भिक्षेसाठी उभा आहे, असें पाहून तो म्हणाला, ''माझ्याप्रमाणे तूं देखील शेत नांगर, पेर, धान्य गोळा कर आणि खा.  भिक्षा कां मागतोस ?''

भगवान् म्हणाला, ''मी देखील शेतकरी आहें.  मी श्रद्धेचें बी पेरतों.  त्यावर तपश्चर्येची (प्रयत्‍नाची) वृष्टि होते.  प्रज्ञा माझा नांगर आहे.  पापलज्जा इसाड, चित्त दोर्‍या, स्मृति (जागृति) नांगराचा फाळ आणि चाबूक आहे.  कायेने आणि वाचेने मी संयम पाळतो.  आहारांत नियमित राहून सत्याच्या योगें (मनोदोषांची) मी खुरपणी करतों.  संतोष ही माझी सुटी आहे.  उत्साह माझे बैल; आणि माझें वाहन अशा दिशेकडे जातें की, जेथे शोक करण्याची पाळी येत नाही !''

या म्हणण्याचा अर्थ भारद्वाजाला तात्काळ समजला व तो बुद्धाचा शिष्य झाला.

ह्या उपदेशांत बुद्धाने शेतीचा निषेध केलेला नाही.  पण त्या शेतीला नीतिमत्तेचें पाठबळ नसलें, तर तिच्यापासून समाजाला सुख न होतां दुःख होईल, एवढाच त्या उपदेशाचा निष्कर्ष आहे.  एकाने पेरलेली शेती पिकाच्या वेळीं दुसर्‍याने बळकावली, तर शेती करण्याला कोणी प्रवृत्त होणार नाही आणि समाजांत भयंकर अव्यवस्था माजेल.  म्हणून प्रथमतः परस्परांचे हितसंबंध अहिंसात्मक असावयास पाहिजेत.  तशा प्रकारची मानसिक शेती केल्याशिवाय या भौतिक शेतीचा उपयोग होणार नाही, हें जाणून बुद्धाने आपल्या संघाला समाजाची नैतिक जागृति करण्यासाठी प्रवृत्त केलें.  त्यामुळे बौद्ध संघ अल्पसंख्याक असतांनाही थोडक्याच काळांत सामान्य लोकसमूहाला प्रिय झाला; आणि आपल्या कर्तबगारीने इतर श्रमणसंघांना त्याने मागे टाकलें.

संघाची संघटना

आपला संघ कार्यक्षम व्हावा, यास्तव बुद्ध भगवंताने फार काळजी घेतली.  संघाची रचना त्याने अशी केली की, आपल्या पश्चात त्यांत एकोपा राहावा आणि त्याच्याकडून लोकसेवा अव्याहत घडून यावी.  वज्जींच्या गणराज्यांतील पुढार्‍यांनी एकत्रित होऊन विचारविनिमय करण्याचे आणि परस्परांच्या हिताचे नियम ठरविण्याची जी पद्धति, तीच थोडेबहुत फेरफार करून बुद्ध भगवंताने आपल्या भिक्षुसंघाला लागू केली असावी, असें महापरिनिब्बानसुत्ताच्या आरंभीं आलेल्या मजकुरावरून दिसून येतें.

वस्सकार ब्राह्मण बुद्धापाशीं येतो आणि वज्जींवर स्वारी करण्याचा आपल्या धन्याचा-अजातशत्रूचा-बेत भगवंताला कळवितो.  आपण घालून दिलेल्या सात नियमांप्रमाणे जोंपर्यंत वज्जी चालतील, तोंपर्यंत त्यांना जिंकणें शक्य नाही असें भगवान् वस्सकार ब्राह्मणाला सांगतो.  आणि वस्सकार निघून गेल्यावर भिक्षुसंघाला म्हणतो ः 'भिक्षुहो, मी तुम्हांला सात अभिवृद्धीचे नियम सांगतों.  (१) जोंपर्यंत भिक्षु पुष्कळदा एके ठिकाणीं जमतील, तोंपर्यंत भिक्षूंची अभिवृद्धीच होईल, परिहानि होणार नाही.  (२) जोंपर्यंत भिक्षु एकमताने जमतील आणि आपल्या संघकर्माचा एकदिलाने विचार करून उठतील, तोंपर्यंत भिक्षूंची अभिवृद्धीच होईल, परिहानि होणार नाही.  (३) जोपर्यंत संघाने न केलेला नियम, केला होता, असें म्हणणार नाहीत आणि केलेला नियम मोडणार नाहीत, नियमाचें रहस्य जाणून त्याप्रमाणे वागतील, तोंपर्यंत भिक्षूंची अभिवृद्धीच होईल, परिहानि होणार नाही.  (४) जोंपर्यंत भिक्षु वृद्ध, शीलवान् पुढार्‍यांचा मान ठेवतील, (५) जोंपर्यंत भिक्षु पुनः पुनः उत्पन्न होणार्‍या तृष्णेला वश होणार नाहीत, (६) जोंपर्यंत भिक्षु एकांतवासाची आवड धरतील, (७) जोंपर्यंत भिक्षु न आलेले सुज्ञ सब्रह्मचारी यावे, आणि आलेले सुज्ञ सब्रह्मचारी सुखाने राहावे, यासाठी नेहमी जागृत राहतील, तोंपर्यंत भिक्षूंची अभिवृद्धीच होईल, परिहानि होणार नाही.''

यावरून असें दिसून येईल की, संघाने एकत्रित जमण्याचे एकमताने संघकृत्यें करण्याचे, वृद्ध, शीलवान्, भिक्षूंचा मान राखण्याचे वगैरे विनयपिटकांत सापडणारे नियम बुद्ध भगवंताने वज्जींसारख्या स्वतंत्र गणराज्यांत प्रचलित असलेल्या पद्धतीवरून घेतले.