भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


गोतम बोधिसत्त्व 5

शाक्यांचा मुख्य धंदा शेती

त्रिपिटक वाङ्‌मयांत मिळणार्‍या माहितीची अशोकाच्या लुम्बिनीदेवी येथील शिलालेखाच्या आधारें छाननी केली असतां असें दिसून येतें की, शुद्धोदन शाक्यांपैकी एक असून लुम्बिनी गावांत राहत होता, आणि तेथेच बोधिसत्त्व जन्मला.  वर दिलेल्या महानामाच्या आणि अनुरुद्धाच्या संवादावरून सिद्ध होतें की, शाक्यांचा मुख्य धंदा शेतीचा होता.  महानामासारखे शाक्य जसे स्वतः शेती करीत; तसाच शुद्धोदन शाक्यही करीत होता.  जातकाच्या निदानकथेंत शुद्धोदनाला महाराजा बनवून त्याच्या शेतीचें वर्णन केलें आहे, तें येणेंप्रमाणें :-

''एके दिवशीं राजाच्या पेरणीचा समारंभ (वप्पमंगलं) होता.  त्या दिवशीं सगळें शहर देवांच्या विमानांप्रमाणें शृंगारीत असत.  सर्व दास आणि कामगार नवीन वस्त्रें नेसून आणि गंधमालादिकांनी भूषित होऊन राजवाड्यांत एकत्र होत.  राजाच्या शेतीवर एक हजार नांगरांचा उपयोग होत असे.  त्या दिवशीं सातशें नव्याण्णव नांगरांच्या दोर्‍या, बैल आणि बैलांचीं वेसणें रुप्याने मढवलेलीं असत; आणि राजाचा नांगर वगैरे शंभर नंबरी सोन्याने मढविलेलीं असत......राजा सोन्याने मढविलेला नांगर धरी, आणि रुप्याने मढविलेले सातशें नव्याण्णव नांगर अमात्य धरीत.  बाकीचे (२००) इतर लोक घेत व सर्वजण मिळून शेत नांगरीत.  राजा सरळ इकडून तिकडे नांगर फिरवीत असे.''

या कथेंत पराचा कावळा झाला असला, तरी एवढें तथ्य आहे की, शुद्धोदन स्वतः शेती करीत होता.  आजकाल महाराष्ट्रांत आणि गुजराथेंत जसे वतनदार पाटील स्वतः शेती करतात आणि मजुरांकडूनही करवून घेतात, त्यांच्यासारखेच शाक्य होते.  फरक एवढाच की, आजकालच्या पाटलांना राजकीय अधिकार फार थोडे आहेत आणि शाक्यांना ते बरेच होते.  आपल्या जमिनींतील कुळांचा आणि मजुरांचा न्याय ते स्वतः करीत, व आपल्या देशाची अन्तर्गत व्यवस्था संस्थागारांत एकत्र जमून पाहत असत.  परस्परांमध्ये कांही तंटा बखेडा उपस्थित झाला, तर त्याचा निकाल ते स्वतःच देत.  मात्र कोणाला हद्दपार करावयाचें असलें, किंवा फाशी द्यावयाचें असलें, तर त्यासाठी त्यांना कोसल राजाची परवानगी घ्यावी लागत असे, असें चूळसच्चकसुत्तांतील खालील संवादावरून दिसून येईल :-

''भगवान् म्हणतो, 'हे अग्गिवेस्सन, पसेनदि कोसलासारख्या किंवा मगधांच्या अजातशत्रूसारख्या मूर्धावसिक्त राजाला आपल्या प्रजेपैकी एखाद्या अपराध्याला देहांतशिक्षा देण्याचा, दंड करण्याचा किंवा हद्दपार करण्याचा पूर्ण अधिकार आहे की नाही ?'

''सच्चक, 'भो गोतम, वज्जी आणि मल्ल या गणराजांना देखील आपल्या राज्यांतील अपराध्याला फाशी देण्याचा, दंड करण्याचा किंवा हद्दपार करण्याचा अधिकार आहे; तर मग पसेनदि कोसल राजाला किंवा अजातशत्रूला हा अधिकार आहे हें सांगावयास नको.' ''

या संवादावरून जाणतां येईल की, गणराज्यांपैकी वज्जींचें आणि मल्लांचें तेवढें पूर्ण स्वातंत्र्य कायम होतें; आणि शाक्य, कोलिय, काशी, अंग इत्यादि गणराजांना अपराध्याला देहान्त शासन देण्याचा, तसाच मोठा दंड करण्याचा किंवा हद्दपार करण्याचा अधिकार राहिला नव्हता.  त्यासाठी शाक्य, कोलिय व काशी या गणराजांना कोसल राजाची व अंग गणराजांना मगधराजाची परवानगी घ्यावी लागत असे.