भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


समकालीन राजकीय परिस्थिति 1

समकालीन राजकीय परिस्थिति

प्रकरण दुसरें

सोळा राष्ट्रें

यो इमेसं सोळसन्नं महाजनपदानं पहूतसत्तरतनानं इस्सराधिपच्चं रज्जं कारेय्य, सेय्यथीदं - (१) अंगानं (२) मगधानं (३) कासीनं (४) कोसलानं (५) वज्जीनं (६) मल्लानं (७) चेतीनं (८) वंसानं (९) कुरूनं (१०) पञ्चालानं (११) मच्छानं (१२) सूरसेनानं (१३) अस्सकानं (१४) अवंतीनं (१५) गंधारानं (१६) कंबोजानं.

हा उतारा अंगुत्तनिकायांत चार ठिकाणीं सापडतो. ललितविस्तराच्या तिसर्‍या अध्यायांतही बुद्ध जन्माला येण्यापूर्वी जंबुद्वीपांत (हिंदुस्थानांत) निरनिराळीं सोळा राज्यें होतीं असा उल्लेख आहे; पण त्यांपैकी आठ राज्यांतील राजकुलांचें तेवढें वर्णन आढळतें. या सर्व देशांचा उल्लेख बहुवचनी आहे. यावरून असें दिसून येतें की, एका काळीं हे देश महाजनसत्ताक होते. यांतील महाजनांना राजे म्हणत आणि त्यांच्या अध्यक्षाला महाराजा म्हणत असत. बुद्धसमकालीं ही महाजनसत्ताक पद्धति दुर्बल होऊन नष्ट होण्याच्या मार्गाला लागली; आणि तिच्या जागीं एकसत्ताक राज्यपद्धति जोराने अमलांत येत चालली होती. या घडामोडीचीं कारणें काय असावीत याचा विचार करण्यापूर्वी वरील सोळा देशांसंबंधाने सापडणारी माहिती संक्षेपरूपाने येथे दाखल करणें योग्य वाटतें.

१. अंगा
अंगांचा देश मगधांच्या पूर्वेला होता. त्याच्या उत्तर भागाला अंगुत्तराप म्हणत. मगध देशाच्या राजाने अंग देश जिंकल्यामुळे तेथील महाजनसत्ताक पद्धति नष्ट झाली. पूर्वीच्या महाजनांचे किंवा राजांचे वंशज होते, तरी त्यांची स्वतंत्र सत्ता राहिली नाही; आणि कालांतराने 'अंगमगधा' असा त्या देशाचा मगध देशाशीं द्वंद्वसमासांत निर्देश होऊं लागला.

बुद्ध भगवान् त्या देशांत धर्मोपदेश करीत असे व त्या देशाच्या मुख्य शहरांत-चंपा नगरींत-गग्गरा राणीने बांधलेल्या तलावाच्या काठीं तो मुक्कामाला राहत असे, असा त्रिपिटक ग्रंथांत पुष्कळ ठिकाणीं उल्लेख सापडतो. पण हें चंपा नगर देखील एखाद्या जुन्या राजाच्या ताब्यांत नव्हतें. बिंबिसार राजाने तें सोणदंड नांवाच्या ब्राह्मणाला इनाम दिलें. या इनामाच्या उत्पन्नावर सोणदंड ब्राह्मण मधून मधून मोठमोठाले यज्ञयाग करीत होता.*
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* दीघनिकाय 'सोणदण्डसुत्त' पहा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२. मगधा
बुद्धकाळच्या राज्यांत मगध आणि कोसल या देशांची एकसारखी भरभराट होत चालली होती; आणि तीं राष्ट्रे एकसत्ताक राज्यपद्धतीच्या कह्यांत पूर्णपणें सापडलीं होतीं. मगधांचा राजा बिंबिसार आणि कोसलांचा राजा पसेनदि (प्रसेनजित्) हे दोघेही महाराजे उदारधी असल्यामुळे त्यांची एकसत्ताक राज्यपद्धति प्रजेला फार सुखावह झाली. हे दोघेही राजे यज्ञयागांना उत्तेजन देत होते खरे, तथापि श्रमणांना (परिव्राजकांना) त्यांच्या राज्यांत आपला धर्मोपदेश करण्याला पूर्णपणें मुभा होती. एवढेंच नव्हे, तर बिंबिसार राजा त्यांच्या राहण्याची वगैरे व्यवस्था करून त्यांना उत्तेजन देत असे. गोतम जेव्हा प्रथमतः संन्यास घेऊन राजगृहाला आला तेव्हा बिंबिसार राजाने पांडवपर्वताच्या पायथ्याशीं जाऊन त्याची भेट घेतली, आणि त्याला आपल्या सैन्यांत मोठी पदवी स्वीकारण्याची विनंती केली. पण गोतमाने आपला तपश्चर्या करण्याचा निश्चय ढळूं दिला नाही. गयेजवळ उरुवेला येथे जाऊन त्याने तपश्चर्या आरंभिली, आणि शेवटीं तत्त्वबोधाचा मध्यम मार्ग शोधून काढला. वाराणसीला पहिला उपदेश करून आपल्या पांच शिष्यांसह बुद्ध भगवान जेव्हा राजगृहाला आला, तेव्हा बिंबिसार राजाने त्याला आणि त्याच्या भिक्षुसंघाला राहण्यासाठी वेळुवन नांवाचें उद्यान दिलें. या उद्यानांत एखादा विहार होता, असा उल्लेख कोठेच सापडत नाही. बिंबिसार राजाने बुद्धाला आणि भिक्षुसंघाला येथे निर्विघ्नपणें राहण्याची परवानगी दिली, एवढाच या वेळुवनदानाचा अर्थ समजला पाहिजे. परंतु त्यावरून भिक्षुसंघाविषयीं त्याचा आदर स्पष्ट दिसतो.

केवळ बुद्धाच्याच भिक्षुसंघासाठी नव्हे, तर या वेळीं जे श्रमणांचे मोठमोठाले संघ होते त्यांनाही बिंबिसार राजाने आश्रय दिला होता. एकाच वेळीं हे श्रमणसंघ राजगृहाच्या आसपास राहत होते, असा उल्लेख दीघनिकायांतील सामञ्ञफलसुत्तांत आणि मज्झिमनिकायांतील (नं. ७७) महासकुलुदायिसुत्तांत आढळतो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
न.भा. १६....३
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------