भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


*परिशिष्ट एक ते तीन 7

यानंतर चौथा तीन प्रासादांचा खंड. त्याचा उल्लेख अंगुत्तरनिकायाच्या तिकनिपातात (सुत्त ३८) आणि मज्झिमनिकायातील मागन्दियसुत्ता (नं. ७५) आला आहे. पहिल्या ठिकाणी, मी पित्याच्या घरी असताना मला राहण्यासाठी तीन प्रासाद होते, असा उल्लेख आहे. पण दुसर्‍यात, तरुणपणी मी तीन प्रश्नसादात राहत होतो, असा मजकूर असून पित्याचा उल्लेख नाही. शाक्य राजे वज्जींएवढे संपन्न नव्हतेच, आणि वज्जींचे तरुण कुमार देखील अशा रीतीने चैनीत राहत होते, याबद्दल कोठेच पुरावा सापडत नाही. याच्या उलट, ते अत्यंत साधेपणाने वागत व चैनीची मुळीच पर्वा करीत नसत, असे वर्णन ओपम्मसंयुत्तांत (वग्ग १, सुत्त ५) सापडते. भगवान् म्हणतो, ‘‘भिक्षुहो, सध्या लिच्छवी लाकडाच्या ओंडक्याच्या उशा करून राहतात, आणि मोठय़ा सावधगिरीने आणि उत्साहाने कवाईत शिकतात. यामुळे मगधाच्या अजातशत्रु राजाला त्यांच्यावर हल्ला करता येत नाही. परंतु भविष्यकाळी लिच्छवी सुकुमार होतील, आणि त्यांचे हात-पाय कोमल बनतील. ते मऊ बिछान्यावर कापसाच्या उशा घेऊन निजतील आणि तेव्हा अजातशत्रू राजा त्यांच्यावर हल्ला करण्यास समर्थ होईल.’’

वज्जींसारखे संपन्न गणराजे जर इतक्या सावधानपणे वागत तर त्यांच्या मानाने बरेच गरीब असलेले शाक्य राजे मोठमोठ्या प्रासादात चैनीत राहत असत हे संभवतच नाही. जर खुद्द शुद्धोदनालाच शेती करावी लागत असे, तर आपल्या मुलाला तो तीन प्रासाद कसे बांधून देईल? तेव्हा ही प्रासादांची कल्पना बुद्धाच्या चरित्रात मागाहून शिरली यात शंका राहत नाही. ती महापदानसुत्तावरून घेतली किंवा स्वतंत्रपणेच एखाद्या भाविकाने बुद्धचरित्रात दाखल केली, हे सांगता येणे शक्य नाही.

वर दिलेला सहावा खंड आणि निदानवग्गसंयुत्ताची नं. ४ ते ६ सुत्ते तंतोतंत एकच आहेत. यावरून असे दिसते की, या महापदानसुत्तावरूनच ती सुत्ते घेतली असावीत. गोतम बुद्धाच्या पूर्वीचे सहाही बुद्ध विचार करीत असताना त्यांना ही प्रतीत्यसमुत्पादाची कारणपरंपरा जशी सापडली, तशीच ती गोमताला देखील बोधिसत्त्वावस्थेत असतानाच सापडली असे निदानवग्गसंयुत्ताच्या दहाव्या सुत्तात वर्णिले आहे. परंतु महावग्गात बुद्ध झाल्यानंतर गोतमाने ही कारणपरंपरा मनात आणली असा आरंभीच उल्लेख आहे. हा प्रतीत्यसमुत्पाद गोतम बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर एक दोन शतकांनी लिहिला असावा आणि त्याला महत्त्व आणण्यासाठी पूर्वीच्या बद्धाच्या चरित्रात तो दाखल केला गेला असावा. होता होता खुद्द बुद्धाच्या चरित्रात देखील त्याला विशेष महत्त्व देण्यात आले. याचा परिणाम एवढाच झाला की, चार आर्यसत्यांचे साधे तत्त्वज्ञान मागे पडून या गहन तत्त्वज्ञानाला नसतेच महत्त्व आले.

उद्यानयात्रेचा पाचवा खंड त्रिपिटक वाङ्मयात गोतम बुद्धाच्या चरित्रात मुळीच घालण्यात आला नाही. तो ललितविस्तर, बुद्धचरित्र आणि जातकाची निदानकथा यात जशाचा तसा किंवा थोडीबहुत अतिशयोक्ति करून घेण्यात आला. या शेवटल्या प्रकरणात तर ‘ततो बोधिसत्तो सारथिं सम्म को नाम एसो पुरिसो केसा पिस्स न यथा अञ्ञेसं ति महापदाने ‘आगतनयेन पुच्छित्वा’ असे म्हटले आहे. त्यावरून या सर्व ग्रंथकारांनी हा मजकूर महापदानसुत्तावरून घेतला असे सिद्ध होते.

पहिल्या खंडांत सांगितल्याप्रमाणे गोतम बुद्धाचे अग्रश्रावक वगैरेंची नावे या सुत्ताच्या प्रस्तावनेत दिलीच आहेत. गोतम बुद्ध क्षत्रिय असल्यामुळे त्याच्या बापाची राजधानी कपिलवस्तु होती असे म्हटले आहे. याशिवाय त्याचे गौत्र गोतम ठरविले आहे. याची चर्चा चौथ्या प्रकरणात केली असून शुद्धोदन शाक्य कपिलवस्तूत कधीच राहत नव्हता हे सिद्ध केलेच आहे. शाक्यांचे गोत्र आदित्य होते आणि त्यांना शाक्य या नावानेच विशेष ओळखत असत. तसे नसते तर बुद्ध भिक्षूंना शाक्यपुत्रीय श्रमण ही संज्ञा मिळाली नसती. बुद्धाचे गोत्र गोतम असते तर त्यांना गोतम किंवा गोतमत श्रमण म्हणण्यात आले असते.