भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 127

भगवान—हे उदायि, माझे श्रावक माझ्याशी आदराने वागतात. व माझ्या आश्रयाखाली राहतात, याला कोणती कारणे असावीत असे तुला वाटते?

उदायि--याला पाच कारणे असावीत असे मी समजतो. ती कोणती?

१)  भगवान अल्पाहार करणारा असून अल्पाहाराचे गुण वर्णितो.
२)  तो कशाही प्रकारच्या चीवरांनी संतुष्ट असतो, व तशा संतुष्टीचे गुण वर्णितो.
३)  जी भिक्षा मिळेल तिच्याने संतुष्ट असतो, आणि तशा संतोषाचे गुण वर्णितो;
४)  राहण्याला मिळालेल्या जागेत संतुष्ट असतो, आणि तशा संतुष्टीचे गुण वर्णितो;
५)  एकांतात राहतो, आणि एकांताचे गुण वर्णितो.

ह्या पाच कारणांनी भगवंताचे श्रावक भगवंताचा मान ठेवतात, आणि आश्रयाखाली राहतात, असे मला वाटते.
भगवान—श्रमण गोतम अल्पाहारी असून अल्पाहाराचे गुण वर्णितो. एवढ्याचसाठी जर, हे उदायि,  श्रावक माझा मान ठेवून माझ्या आश्रयाखाली राहिले असते, तर माझ्या श्रावकांत माझ्यापेक्षाही अत्यंत अल्पाहार करणारे जे श्रावक आहेत, त्यांनी माझा मान ठेवला नसता, आणि ते माझ्या आश्रयाखाली राहिले नसते.

मिळेल त्या चीवराने श्रमण गोतम संतुष्ट राहत असून तशा संतुष्टीचे गुण वर्णितो, एवढ्यासाठी जर, उदायि. माझे श्रावक माझा मान ठेवून माझ्या आश्रयाने राहिले असते, तर माझ्या श्रावकांत, जे स्मशानातून, कच-याच्या राशीतून किंवा बाजारातून चिंध्या गोळा करून त्यांची चीवरे करतात आणि वापरतात, त्यांनी माझा मान ठेवला नसता. व तो माझ्या आश्रयाने राहिले नसते. कारण, मी कधी कधी, गृहस्थांनी दिलेल्या वस्त्रांची देखील चीवरे धारण करतो.

श्रमण गोतम मिळालेल्या भिक्षेने संतुष्ट असतो आणि तशा संतोषाचे गुण वर्णितो, एवढय़ाचसाठी जर माझे श्रावक माझा मान देवून माझ्या आश्रयाखाली राहिले असते, तर त्यांत जे केवळ भिक्षेवरच अवलंबून राहतात, लहान मोठे घर वर्ज्य न करता भिक्षा घेतात आणि त्या भिक्षेवरनिर्वाह करतात, ते माझा मान ठेवून माझ्या आश्रयाने राहिले नसते. कारण कधी कधी गृहस्थाचे आमंत्रण स्वीकारून चांगले अन्न खातो.

श्रमण गोतम मिळालेल्या राहण्याच्या जागेत संतोष मानतो, आणि तशा संतुष्टीचे गुण वर्णितो एवढय़ाचसाठी जर हे, उदायि, माझे श्रावक मला मान देऊन माझ्या आश्रयाखाली राहिले असते, तर त्यांत जे झाडाखाली किंवा उघड्या जागेत राहतात आणि आठ महिने आच्छादिलेल्या जागेत प्रवेश करीत नाहीत, ते माझा मान ठेवुन माझ्या आश्रयाने राहिले नसते. कारण, मी कधी कधी मोठाल्या विहारात देखील राहतो.

श्रमण गोतम एकांतात राहत असून एकांताचे गुण वर्णितो, एवढय़ाचसाठी जर माझे श्रावक माझा मान ठेवून माझ्या आश्रयाने राहिले असते, तर त्यांत जे अरण्यातच राहतात, केवळ पंधरा दिवसांनी प्रश्नतिमोक्षासाठी संघात येतात, ते माझा मान ठेवून माझ्या आश्रयाने राहिले नसते. कारण, मी कधी कधी भिक्षु, भिक्षुणी, उपासक, उपासिका, राजा, मंत्री इतर संघाचे पुढारी आणि त्यांचे श्रावक, यांना भेटतो.

परंतु हे उदायि दुसरे पाच गुण आहेत की, ज्यामुळे माझे श्रावक माझा मान ठेवून माझ्या आश्रयाखाली राहतात.

१)  श्रमण गोतम शीलवान आहे.
२)  तो यथार्थतया धर्मोपदेश करतो.
३)  तो प्रज्ञावान आहे. म्हणून माझे श्रावक मला मानतात आणि माझ्या आश्रयाने राहतात.
४)  याशिवाय मी माझ्या श्रावकांना चार आर्यसत्यांचा उपदेश करतो, आणि
५)  आध्यात्मिक उन्नतीचे निरनिराळे प्रकार दाखवितो. या पाच गुणांमुळे माझे श्रावक माझा मान ठेवतात आणि आश्रयाने राहतात.