भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 117

काही तपस्वी मांसाहार वज्र्य करीत

बुद्धसमकालीन काही तपस्वी लोक मांसाहार निषिद्ध समजत. त्यापैकी एका तपस्व्याच्या आणि काश्यप बुद्धाचा संवाद सुत्तनिपातातील (१४ व्या) आमगंध सुत्तात सापडतो. त्या सुत्ताचे भाषांतर असे-

१. (तिष्य तापस-) श्यामक, चिंगूलक, चीनक, झाडांची पाने, कंदमूळ आणि फळे धर्मानुसार मिळाली असता त्यांजवर निर्वाह करणारे चैनीच्या पदार्थासाठी खोटे बोलत नसतात.
२. हे काश्यपा, परक्यांनी दिलेले निवडक व चांगल्या रीतीने शिजविलेल्या तांदळांचे सुरस व उत्तम अन्न स्वीकारणारा तू आमगंध (अमेध्य पदार्थ) खातोस!
३. हे ब्रह्मबंधु, पक्ष्याच्या मांसाने मिश्रित तांदळांचे अन्न खात असता तू आपणाला आमगंध योग्य नाही, असे म्हणतोस! तेव्हा हे काश्यपा, मी तुला विचारतो की तुला आमगंध कशा प्रकारचा?
४. (काश्यप बुद्ध-) प्राणघात, वध, छेद, बंधन, चोरी, खोटे भाषण, ठकवणे, नाडणे, जारणमारणादिकांचा अभ्यास आणि व्यभिचार, हा आमगंध होय; मांसभोजन हा नव्हे.
५. ज्यांना स्त्रियांच्या बाबतीत संयम नाही, जे जिव्हालोलुप, अशुचिकर्ममिश्रित, नास्तिक, विषम आणि दुर्विनीत त्यांचे कर्म हा आमगन्ध होय; मांसभोजन हा नव्हे.
६. जे रुक्ष, दारुण, चहाडखोर, मित्रद्रोही, निर्दय, अतिमानी, कृपण, कोणाला काहीही देत नाहीत, त्यांचे कर्म हा आमगंध होय; मांसभोजन हा नव्हे.
७. क्रोध, मदक कठोरता, विरोध, माया, ईर्ष्या, वृथा बडबड, मानातिमान आणि खळांची संगति हा आमगंध होय; मांसभोजन हा नव्हे.
८. पापी, ऋण बुडवणारे, चहाडखोर, लाच खाणारे खोटे अधिकारी, जे नराधम इहलोकी कल्मष उत्पन्न करतात त्यांचे कर्म हा आमगंध होय; मांसभोजन हा नव्हे.
९. ज्यांना प्राण्यांविषयी दया नाही, जे इतरांना लुटून उपद्रव देतात, दु:शील, भेसूर, शिवीगाळ देणारे व अनादर करणारे (त्यांचे कर्म)- हा आमगंध होय; मांसभोजन हा नव्हे.
१०. अशा कर्मात आसक्त झालेले, विरोध करणारे, घात करणारे, सदोदित अशा कर्मात गुंतलेले की जे परलोकी अंधकारात शिरतात व वर पाय, खाली डोके होऊन नरकात पडतात (त्यांचे कर्म)- हा आमगंध होय; मांसभोजन हा नव्हे.
११. मत्स्यमांसाचा आहार वज्र्य करणे, नागवेपणा, मुंडण, जटा, राख फासणे; खरखरीत अजिनचर्म, अग्निहोत्राची उपासना किंवा इहलोकीच्या दुसर्‍या विविध तपश्चर्या, मंत्राहुति, यज्ञ आणि शीतोष्णसेवनाने तप करणे, या गोष्टी कुशंकांच्या पार न गेलेल्या मर्त्यांला पावन करू शकत नाहीत.
१२. इंद्रियात संयम ठेवून व इंद्रिये जाणून वागणारा, धर्मस्थित, आर्जव व मार्दव यांत संतोष मानणारा, संगातील व ज्याचे सर्व दु:ख नाश पावले असा जो धीर पुरुष, तो दृष्ट आणि श्रुत पदार्थात बद्ध होत नाही.
१३. हा अर्थ भगवंताने पुन: पुन्हा प्रकाशित केला आणि त्या मंत्रपारगाने (ब्राह्मण-तापसाने) तो जाणला. हा अर्थ त्या निरामगंध, अनासक्त आणि अदम्य मुनीने रम्य गाथांनी प्रकाशित केला.
१४. निरामगंध आणि सर्व दु:खऋंचा नाश करणारे असे बुद्धाचे सुभाषित वचन ऐकून तो (तापस) नम्रपणे तथागताच्या पाया पडला आणि त्याने येथेच प्रव्रज्या घेतली.