भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 104

“सगळी संसारबंधने छेदून जो कोणत्याही प्रापंचिक दु:खाला भीत नाही, कोणत्याही गोष्टीची ज्याला आसक्ति नाही, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. इतरांनी दिलेल्या शिव्यागाळी, बधबन्ध इत्यादी जो सहन करतो, क्षमा हेच ज्याचे बळ, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. कमलपत्रावरील जलबिंदूप्रमाणे जो इहलोकीच्या विषयसुखापासून अलिप्त राहतो, त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो...”

“जन्मामुळे ब्राह्मण होत नाही, किंवा अब्राह्मण होत नाही. कर्मानेच ब्राह्मण होतो आणि कर्मानेच अब्राह्मण होतो. शेतकरी कर्माने होतो, कारागीर कर्माने होतो, चोर कर्माने होतो आणि राजा देखील कर्मानेच होतो. कर्मानेच हे सगळे जग चालत आहे. आसावर अवलंबून जसा रथा चालतो, तसे सर्व प्राणी आपल्या कर्मावर अवलंबून राहतात.”

हा बुद्धाचा उपदेश ऐकून वासिष्ठ् आणि भारद्वाज त्याचे उपासक झाले.

ब्राह्मण आणि अब्राह्मण सारखेच!


वर दिलेल्या पुरुषसूक्ताच्या ऋचेच्या आधारे ब्राह्मण प्रतिपादन करीत असत की, ब्रह्मदेवाच्या मुखापासून झाल्यामुळे चारी वर्णात आपण श्रेष्ठ आहोत. मज्झिमनिकायतील स्सलायनसुत्ता यासंबंधी बुद्ध भगवंताचा संवाद फारच बोधप्रद आहे. त्या सुत्ताचा सारांश असा –

एके समयी बुद्ध भगवान येथे अनाथपिंडिकाच्या आरामात राहत होता. त्या वेळी निरनिराळ्या देशांतून पाचशे ब्राह्मण काही कारणास्तव श्रवस्तीला आले होते. त्या ब्राह्मणांमध्ये असा एक प्रश्न उपस्थित झाला की, हा श्रमण गोतम चारही वर्णांना मोक्ष मिळतो असे प्रतिपादन करतो. त्याजबरोबर वाद करून हे त्याचे म्हणमे कोण खोडून काढील? शेवटी या कामी आश्वलायन ब्राह्मणकुमाराची योजना करावी असे ठरले.

आश्वलायन कुमाराचे अध्ययन नुकतेच पुरे झाले होते. निघटू, छंद, शास्त्र इत्यादि वेदांगासहवर्तमान त्याला चारही वेद तोंडपाठ येत असत. तथापि बुद्ध भगवंताशी वाद करणे सोपे नव्हे हे तो जाणून होता. बुद्धाशी वाद करण्यास जेव्हा त्याची निवड झाली तेव्हा तो त्या ब्राह्मणांना म्हणाला, “भो, श्रमण गोतम धर्मवादी आहे, धर्मवादी लोकांशी वाद करणे सोपे नाही. जरी मी वेदांमध्ये पारंगत असलो तरी गोतमवरील वादविवाद करण्याला समर्थ नाही.”

बराच वेळ भवति न भवति झाल्यावर ते ब्राह्मण आश्वलायनाला म्हणाले, “भो आश्वलायन तू परिद्राजक धर्मचा अभ्यास केला आहे. आणि युद्धावाचून पराजित होणे तुला योग्य नाही.” आश्वलायन म्हणाला, गोतमाशी वाद करणे जरी कठीण आहे, तरी तुमच्या आग्रहास्तव मी तुमच्याबरोबर येतो.”