भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 98

जातात, याची कूटदन्ताने चौकशी केली, आणि तो आपल्या हुजर्‍याला म्हणाला, “या ब्राह्मणांना सांग की, मी देखील भगवंताच्या दर्शनाला जाऊ इच्छितो. तुम्ही जरा थांबा.”
कूटदन्ताच्या यज्ञासाठी पुष्कळ ब्राह्मण जमले होते. कूटदन्त भगवंताच्या दर्शनाला जाणार. हे वर्तमान ऐकल्याबरोबर  त्याजपाशी येऊन म्हणाले, “भो कूटदन्त गोतमाच्या दर्शनाला तू जाणार आहेस, ही गोष्ट खरी काय?”

कूटदन्त—होय, मला गोतमाच्या दर्शनाला जावे असे वाटते.

ब्राह्मण—भो कूटदन्त, गोतमाच्या दर्शनाला जाणे तुला योग्य नाही. जर तू त्याच्या दर्शनाला जाशील तर त्याच्या यशाची अभिवृद्धि आणि तुझ्या यशाची हानि होईल, म्हणून गोतमानेच तुझ्या भेटीला यावेस आणि तू त्यांच्या भेटीला जाऊ नये हे चांगले. तू उत्तम कुलात जन्मला आहेस. धनाढ्य आहेस, विद्वान आहेस, सुशील आहेस, पुष्कळांचा आचार्य आहेस, तुजपशी वेदमंत्र शिकण्यासठी चोहोंकडून पुष्कळ शिष्य येतात गोतमापेक्षा तू वयाने मोठा आहेस, आणि मगधराजाने बहुमानपुरस्सर हा गाव तुला इनाम दिला आहे. तेव्हा गोतमाने तुझ्या भेटीला यावे आणि तू त्याच्या भेटीला जाऊ नयेस हे योग्य होय.

कूटदन्त—आता माझे म्हणणे काय ते ऐका. श्रमण गोतम थोर कुलात जन्मलेला असून मोठ्या संपत्तीचा त्याग करून श्रमण झाला आहे. त्याने तरुण वयात संन्यास घेतला. तो तेजस्वी व सुशील आहे. तो मधु आणि कल्याणप्रद वचन बोलणारा असून पुष्कळांचा आचार्य आणि प्राचार्य आहे. तो विषयपासून मुक्त होऊन शांत झाला आहे. तो कर्मवादी आणि क्रियावादी आहे. सर्व देशातील लोक त्याचा धर्म श्रवण करण्याला येत असतात. तो सम्यक्, संबुद्ध, विद्याचरणसंपन्न, लोकवद, दम्य पुरुषांचा सारथि, देव-मनुष्याचा शास्ता अशी त्याची कीर्ति सर्वत्र पसरली आहे. बिंबिसार राजा तसाच पसेनदि कोसलराजा आपल्या परिवारासह त्याचा श्रावक झाला. या राजांना जसा तसाच तो पौष्करवादीसारख्या ब्राह्मणांना पूज्य आहे. त्याची योग्य एवढी असून सांप्रत तो आमच्या गावी आला असता त्याला आम्ही आमचा अतिथि समजले पाहिजे, आणि अतिथि या नात्याने त्याच्या दर्शनाला जाऊन त्याचा सत्कार करणे आम्हाला योग्य आहे.

ब्राह्मण—भो कूटदन्त, तू जी ही गोतमाची स्तुति केलीस तिजमुळे आम्हाला असे वाटते की, सदगृहस्थाने शंभर योजनांवर अजून देखील त्याची भेट घेणे योग्य होईल, चला, आपण सर्वच त्याच्या दर्शनाला जाऊ. तेव्हा कूटदन्त या ब्राह्मणसमुदयासह आम्रयष्टिवनामध्ये भगवान राहत होता तेथे आला आणि भगवंताला कुशलप्रश्नादिक विचारून एका बाजूला बसला. त्या ब्राह्मणांपैकी काही जण भगवंताला नमस्कार करून काही जण आपले नामगोत्र कळवून आणि काही जण कुशलप्रश्नादिक विचारून एका बाजूला बसले. आणि कूटदन्त भगवंताला म्हणाला, “आपणाला उत्तम यज्ञविधि माहीत आहे, असे मी ऐकले, तो जर आपण आम्हाला सजावू सांगाल, तर चागले होईल.” भगवंताने खालील कथा सांगितली –