भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 83

ईश्वरवाद

बुद्ध ईश्वराला मानीत नव्हता, म्हणून तो नास्तिक होता, अशी काही लोकांची समजूत आहे. बौद्ध वाङमय किंवा प्राचीन उपनिषदे वाचली असता या समजुतीत तथ्य नाही, असे दिसून येते. तथापि हा लोकभ्रम दूर करण्यासाठी बुद्धसमकाली प्रचलित असलेल्या ईश्वरवादाचे दिग्दर्शन करणे योग्य वाटते. खास ईश्वर शब्दाचा अङगुत्तरनिकायाच्या तिकनिपातात (सुत्त नं. ६९) आणि मज्झिमनिकायाती देवदहसुत्ता (नं. १०१) उल्लेख आला आहे. त्यापैकी ईश्वरासंबंधीचा पहिल्या सुत्तातील मजकूर असा :--

भगवान म्हणतो, “भिक्षुहो, जे काही सुख, दु:ख किंवा उपेक्षा मनुष्य प्राणी भोगतो ते सर्व ईश्वरनिमित्त आहे. (इस्सरनिम्मानहेतु) से प्रतिपादणार्‍यांना आणि मानणार्‍यांना मी विचारतो की, त्याचे हे मत आहे काय? आणि त्यांनी ‘होय’ असे उत्तर दिल्यावर मी म्हणतो, तुम्ही प्राणघातकी, चोर, अब्रह्मचारी, सत्यवादी, चहाडखोर, शिवीगाळ करणारे, बडबडणारे, दुसर्‍याचे दान इच्छिणारे, द्वेष्टे आणि मिथ्यादृष्टिक ईश्वराने निर्मिल्यामुळेच झाला की काय? भिक्षुहो, हे सर्व ईश्वराने निर्माण केले असे सत्य मानले, तर (सत्कर्माविषयी) छंद आणि उत्साह राहणार नाही; अमुक करावे, किंवा अमुक करू नये हे देखील समजणार नाही.”

या ईश्वरनिर्माणाचा उल्लेख देवदहसुत्तात देखील आला आहे. परंतु हा मजकूर प्रक्षिप्त असावा, अशी बळकट शंका येते. कारण दुसर्‍या कोणत्याही सुत्तात ही कल्पना आढळत नाही. बुद्धसमकालीन मोठा देव म्हटले म्हणजे ब्रह्मा होय. पण तो निराळ्या तऱ्हेचा कर्ता आहे. बायबलातील देवासारखा नाही. जग होण्यापूर्वी तो नव्हता. विश्व उत्पन्न झाल्यावर प्रथमत: आणि त्यानंतर प्राणी झाले, त्यामुळे त्याला भूतभव्याचा कर्ता म्हणू लागले. ब्रह्मजालसुत्तात आलेल्या त्याच्या वर्णनाचा सारांश असा –
“पुष्कळ काळानंतर ह्या जगाचा संवर्त (नाश) होतो. आणि त्यातील बहुतेक प्राणी आभास्वर देवलोकात जातात. त्यानंतर पुष्कळ काळाने या जगाचा विवर्त (विकास) होऊ लागतो. तेव्हा प्रथमत: रिकामे ब्रह्मविमान उत्पन्न होते. तदनंतर आभास्कर देवलोकीचा एक प्राणी तेथून च्यूत होऊन या विमानात जन्मतो. तो मनोमय, प्रीतिभक्ष्य, स्वयंप्रश्न, अन्तरिक्षचर, शुभस्थायी आणि दिर्घजीवी असतो. त्यानंतर दुसरे अनेक प्राणी भास्कर, देवलोकातून च्यूत होऊन त्या विमानात जन्मतात. त्यांना वाटते हा जो भगवान ब्रह्मा, महाब्रह्मा, तो अभिभू, सर्वदर्शी, यशवर्ती, ईश्वर, कर्ता, निर्माता, श्रेष्ठ, सर्जिता, वशी आणि भूभव्याचा पिता आहे.”

‘ब्रह्मा देवानां प्रथम: संबभूव विश्वस्य कर्ता भुवनस्य गोप्ता।’  ह्या मुण्डकोपनिषदाच्या (१।१) वाक्यात ब्रह्मदेवाची वर दिलेली कल्पना संक्षेपत: निर्देशिलेली आहे. यावरून ब्रह्मदेवाला जगताचा कर्ता बनवण्याचा ब्राह्मणांचा प्रयत्न स्पष्ट दिसतो, परंतु तो त्या काळाच्या श्रमणसंस्कृतीसमोर टिकू शकला नाही. खुद्द ब्राह्मणांनाच हा प्रयत्न सोडून देऊन ब्रह्म हा नपुंसकलिंगी शब्द स्वीकारावा लागला आणि बहुतेक सर्व उपनिषदांतून या ब्रह्म शब्दालाच महत्त्व दिले आहे.

ब्रह्मापासून किंवा आत्म्यापासून जगाची उत्पत्ति कशी झाली याची एक कल्पना बृहदारण्यक उपनिषदात सापडते ती अशी –
आत्मैवेदमग्न आसीत् पुरुषविध... स वै नैव रेमे तस्मादेकाकी न रमते। स द्वितीयमैच्छत्। स हैतावानास यथा स्त्रीपुमसो संपरिष्पवक्तौ। स इममेवात्मानं द्वेधा पतयत्त: पतिश्च पत्नी चाभवतां तस्मादिदमर्धबुगलमिव स्व इति।

‘सर्वांपूर्वी पुरुषरूपी आत्मा तेवढा होता... तो रमला नाही; म्हणून (मनुष्य) एकाकी रमत नसतो. तो दुसर्‍यांची इच्छा करू लागला. आणि जसे स्त्रीपुरुष परस्परांना आलिंगन देतात तसा होऊन राहिला. त्याने स्वत:ला द्विधा फोडले. त्यामुळे पति आणि पत्नी झाली. म्हणून हे शरीर (द्विदल धान्याच्या) दलाप्रमाणे आहे.’ (बृ. उ. १।४।१-३)

आता बायबलातील उत्पत्तिकथा पाहा. “मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य बनविला... मग देवाने आदामावर (त्या माणसावर) गाढ निद्रा पाडली, आणि त्याची बरगडी काढून तिची स्त्री बनविली... यास्तव पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील, ती दोघे एकदेह होतील.” (बायबल, उत्पत्ति, अ. २)

ह्या आणि वरील उत्पत्तीत केवढा फरक! येथे देव सर्व पृथ्वी निर्माण करून मग माणसाला व त्याच्या बरगडीपासून स्त्रीला उत्पन्न करतो; देव जगापासून अगदीच भिन्न; आणि तेथे पुरुषरूपी आत्मा स्वत:च द्विधा होऊन स्त्री आणि पुरुष बनतो.