भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 82

अनावश्यक वाद

एवढे स्पष्टीकरण करून झाल्यावर जर कोणी हट्ट धरून बसला की, शरीर आणि आत्मा एक आहे किंवा भिन्न आहे हे सांगा, तर भगवान म्हणे, “ह्या ऊहापोहात मी पडत नसतो. का की, त्यामुळे मनुष्यजातीचे कल्याण होणार नाही.” याचा थोडासा मासला चुळमालुंक्यपुत्तसुत्ता सापडतो. त्या सुत्ताचा सारांश असा –

‘बुद्ध भगवान श्रावस्ती येथे अनाथपिंकाच्या आरामात राहत असता मालुंक्यपुत्त नावाचा भिक्षु त्याजपाशी आला आणि आणि नमस्कार करून एका बाजूला बसला. नंतर तो भगवन्ताला म्हणाला, “भदंत्त, एकान्तात बसलो असता माझ्या मनात असा विचार आला की, हे जग शाश्वत आहे किंवा अशाश्वत हे, शरीर व आत्मा एक आहे की भिन्न मरणोत्तर तथागताला पुनर्जन्म आहे की नाही. इत्यादि प्रश्नांचा भगवन्ताने खुलासा केला नाही, तेव्हा भगवताला मी हे प्रश्न विचारावे आणि जर भगवंताला या प्रश्नाचा निकाल लावता आला, तरच भगवंताच्या शिष्यशाखेत राहावे. पण जर भगवन्ताला हे प्रश्न सोडवता येत नसले, तर भगवन्ताने सरळ तसे सांगावे.”

भ.— मालुंक्यपुत्ता तू माझा शिष्य होशील, तर या प्रश्नांचे स्पष्टीकरण करीन असे मी तुला कधी सांगितले होते काय?
मा.— नाही, भदन्त.
भ.— बरे, तू तरी मला म्हणालास की, जर भगवन्ताने या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण केले तरच मी भगवन्ताच्या भिक्षुसंघात समाविष्ट होईन.
मा.— नाही भदन्त.
भ.— तर मग आता ह्या प्रश्नांचा खुलासा केल्याशिवाय मी भगवन्ताचा शिष्य राहणार नाही असे म्हणण्यात अर्थ कोणता? मालुंक्यपुत्ता एखाद्या मनुष्याच्या शरीरामध्ये बाणाचे विषारी शल्य शिरून तो तळमळत असता त्याचे आप्तमित्र शस्त्रक्रिया करणार्‍या कैद्याला बोलावून आणतील. पण तो रोगी जर त्याला म्हणेल, ‘हा बाण कोणी मारला? तो ब्राह्मण होता की क्षत्रिय होता? वैश्य होता की क्षुद्र होता? काळा होता की गोरा होता? त्याचे धनुष्य कोणत्या प्रकारचे होते? धनुष्याची दोरी कोणत्या पदार्थाची केली होती? इत्यादिक गोष्टींचा खुलासा केल्यावाचून मी या शल्याला हात लावू देणार नाही. तर हे मालुंक्यपुत्ता, अशा परिस्थितीत त्या माणसाला या गोष्टी न समजताच मरण येईल. त्याचप्रमाणे जो असा हट्ट धरील की, जग हे शाश्वत आहे किंवा अशाश्वत आहे. इत्यादि गोष्टींचे स्पष्टीकरण केल्यावाचून मी ब्रह्मचर्य आचरणार नाही, त्याला या गोष्टी समजल्यावाचूनच मरण येईल.

हे मालुंक्यपुत्ता जग शाश्वत आहे किंवा अशाश्वत आहे अशी दृष्टि आणि विश्वास असला तरी त्यापासून धार्मिक आचरणाला मदत होईल असे नाही. जर शाश्वत आहे असा विश्वास ठेवला तरी जरा मरण, शोक, परिदेव यांजपासून मुक्तता होत नाही. त्याचप्रमाणे जग शाश्वत नाही, शरीर आणि आत्मा एक आहे. शरीर आणि आत्मा भिन्न आहे. मरणोत्तर तथागताचा पुनर्जन्म होतो किंवा होत नाही, इत्यादिक गोष्टीवर विश्वास ठेवला न ठेवला तरी जन्म जरा मरण, परिदेव आहेतच आहेत, म्हणून मालुंक्यापुत्ता या गोष्टीचा खल करण्याच्या भरीला मी पडलो नाही. का की, त्या वादविवादाने ब्रह्मचर्यांला कोणत्याही प्रकारे स्थैर्य येण्याचा संभव नाही. त्या वादाने वैराग्य उत्पन्न होणार नाही, पापाचा निरोध होणार नाही, आणि शांति, प्रज्ञा, संबोध व निर्वाण यांचा लाभ व्हावयाचा नाही.

‘परंतु मालुंक्यपुत्ता हे दु:ख आहे, हा दु:खाचा समुदय आहे. हा दु:खाचा निरोध आहे, आणि हा दु:खनिरोधाचा मार्ग हे, हे मी स्पष्ट करून दाखविले आहे. कारण ही चार आर्यसत्ये ब्रह्मचर्याला स्थैर्य आणणारी आहेत, यामुळे वैराग्य येते, पापाचा निरोध होतो. शांति, प्रज्ञा, संबोध व निर्वाण यांचा लाभ होतो. म्हणून हे मालुंक्यपुत्ता ज्या गोष्टीची मी चर्चा केली नाही. त्या गोष्टीची चर्चा करू नका, ज्या गोष्टीचे मी स्पष्टीकरण केले आहे, त्या स्पष्टीकरणाला योग्य होत असे समजा.’

याचा अर्थ असा की, आत्मा पंचस्कन्धाचा बनलेला आहे, तरी त्याचा आकार वगैरे कसा असतो, तो जसाच्या तसा परलोकी जातो की काय, इत्यादी गोष्टींचा खल केल्याने ब्रह्मघोटाळा माजून राहणार. जगात दु:ख विपुल आहे, आणि ते मनुष्यजीच्या तृष्णेने उत्पन्न झाले असल्यामुळे अष्टांगिक मार्गाच्या द्वारे त्या तृष्णेचा निरोध करून जगात सुखशांति स्थापन करणे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. हा सरळ रस्ता व हेच युद्धाचे तत्त्वज्ञान.