भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 68

भिक्षुसंघतील दुसरे एक भांडण

दुसरे एक भिक्षुसंघात साधारण भांडण कौशाम्बी येथे उद्भवल्याचे सविस्तर वर्णन महावग्गात सापडते. महावग्गाच्या कर्त्याने किंवा कर्त्यांनी संघाला ह्यासारख्या इतर प्रसंगी उपयोगी पडेल अशा रीतीने या कथेची रचना केली आहे. त्याच्या म्हणण्याचा सारांश असा की, दोघा विद्वान भिक्षूंत विनयाच्या एका क्षुद्र नियमासंबंधाने मतभेद होऊन हे भांडण उपस्थति झाले. त्या वेळी भगवंताने त्यांना दीर्घायुची गोष्ट सांगितली. परंतु ते ऐकेनात. त्यापैकी एक भिक्षु म्हणाला, “भदन्त, आपण स्वस्थ राहा. आम्ही या भांडणाचे काय होते ते पाहून घेऊन.” या सर्वांची मने कलुषित झाली आहेत असे पाहून भगवान कौशाम्बीहून प्राचीन वसदान उपवनात गेला. तेथे अनुरुद्ध, नंदिय व किम्बिल हे तिघे भिक्षु राहात असत. त्यांचा एकोपा पाहून भगवंताने त्यांचे अभिनंदन केले; आणि तेथून भगवान परिलेय्यक वनात गेला. त्याच वेळी एका हत्तीच्या कळपाचा पुढारी हत्ती आपल्या कळपाला कंटाळून त्या वनात एकटाच राहत होता. त्याने भगवंताचे स्वागत केले. भगवान त्या ठिकाणी काही काळ राहून श्रावस्तीला आला.

इकडे कौशाम्बी येथील उपासकांनी त्या भांडणार्‍या भिक्षूंना ताळ्यावर आणण्यासाठी त्यांचा कोणत्याही रीतीने आदरसत्कार करू नये आणि त्यांना भिक्षा देऊ नये, असा बेत केला. त्यामुळे वठणीला येऊन ते भिक्षु श्रावस्तीला गेले. तेव्हा भगवंताने भांडण कसे मिटवावे यासंबंधाने काही नियम करून उपलि वगैरे भिक्षूंकडून ते भांडण मिटविले.**

मज्झिमनिकायातील उपक्किलेससुत्तात (सं. १२८) महावग्गाच्या मजकुरीपैकी बराच भाग आला आहे. पण त्याच्यामध्ये दीर्घायुची गोष्ट तर नाहीच आणि त्या सुताची समाप्ति प्राचीन वंसदान वनातच होते. पारिलेय्यक वनात बुद्ध भगवान गेल्याचा भाग त्या सुत्तात नाही. तो उदानवग्गात सापडतो.

कौसम्बियसुत्ता यापेक्षा निराळाच मजकूर आहे. त्याचा सारांश असा –
भगवान कौशाम्बी येथे घोषितारामात राहत होता त्या वेळी कौशाम्बीतील भिक्षु परस्परंशी भांडत होते. भगवंताला ही गोष्ट समजली तेव्हा त्याने त्या भिक्षूंना बोलावून आणले; आणि भगवान त्यांना म्हणाला, “भिक्षुहो, जेव्हा तुम्ही परस्परांशी भांडता तेव्हा तुमचे परस्परांविषयी कायिक, वाचसिक आणि मनसिक कर्म मैत्रीमय होणे शक्य आहे काय?”

“नाही.” असे त्या भिक्षूंनी उत्तर दिले. तेव्हा भगवान म्हणाला “जर असे नाही, तर तुम्ही भांडता कशाला? निरर्थक माणसांनो, अशा प्रकारचे भांडण तुम्हाला चिरकाल हानिकारक आणि दु:खकारक होईल.”

पुन्हा भगवान म्हणाला, “भिक्षुहो, ह्या हा संस्मरणीय गोष्टी भांडणे तोडण्याला, सामग्रीला आणि एकोप्याला कारणीभूत होतात. त्या कोणत्या? (१) मैत्रीमय कायिक कर्मे, (२) मैत्रीमय वाचसिक कर्मे, (३) मैत्रीमय मानसिक कर्मे, (४) उपासकांकडून मिळालेल्या धनधर्माचा सर्व संघाबरोबर समविभगाने उपभोग घेणे, (५) आपल्या शीलात यत्किंचित उणीव भासू न देणे, आणि (६) कार्यश्रावकाला शोभण्यासारखी सम्यक् दृष्टि ठेवणे.”

या सम्यक् दृष्टीचे भगवंताने बरेच विवेचन केले आहे ते विस्तारपूर्वक येथे देण्याची आवश्यकता वाटत नाही. या उपदेशाच्या शेवटी त्या भिक्षूंनी भगवंताच्या भाषणाचे अभिनंदन केले. याचा अर्थ असा की, हे भांडण तेथल्या तेथेच मिटले. नाही तर भगवंताच्या भाषणाचे त्या भिक्षूंनी अभिनंदन कसे केले असते? महावग्गात आणि उपविकलेस सुत्तात त्या भिक्षूंनी भगवंताचे अभिनंदन केल्याचा उल्लेख नाही, ते भांडतच राहिले आणि त्यांना कंटाळून भगवान तेथून निघून प्राचीन वंसदान वनात गेला असे तेथे म्हटले आहे. तेव्हा या परस्पर विरोधाचा मेळ कसा घालावा?

अंगुत्तर निकायातील चतुक्क निपाताच्या २४१ व्या सुत्तात हा मजकूर आहे –एके काळी भगवान कौशाम्बी येथे घोषितारामात राहत होता. तेव्हा आयुष्मान आनंद त्याजपाशी येऊन नमस्कार करून एका बाजूला बसला. त्याला भगवान म्हणाला, “आनंदा, तो खटला मिटला की नाही?”

आ. – भदन्त, खटला मिटणार कसा? अनुरुद्धचा शिष्य बाहिय जणू काय संघभेद करण्यासाठी प्रवृत्त झाला आहे; आणि अनरुद्ध त्याला एक शब्द देखील बोलत नाही.

भ. – पण, आनंदा, अनुरुद्ध संघातील भांडणे तोडण्याच्या कामी कधी हात घालीत असतो? तू आणि सारिपुत्त-मोग्गल्लान ही भांडणे मिटवीत नसता काय?

यावरून असे दिसून येईल की, बाहियामुळे हे भांडण उपस्थित होऊन विकोपाला गेले आणि ते मिटविण्याच्या कामी खुद्द भगवंताला प्रयत्न करावा लागला. त्या भिक्षूंच्या सभेतून भगवान काही काळ दुसरीकडे गेला असला तरी ते भांडण कौशाम्बी येथेच मिटले असावे.

अशा प्रसंगी भांडखोर भिक्षूंना ताळ्यावर आणण्यासाठी उपासकांनी त्यांच्यावर बहिष्कार घालावा आणि ते शुद्धीवर आले म्हणजे कोणत्या तरी पद्धतीने ते भांडण मिटवावे, हे दाखविण्याच्या उद्देशाने महावग्गाच्या कर्त्याने ही गोष्ट रचली आहे असे सिद्ध होते. असल्या लहानसहान भांडणाचा संघावर विपरत परिणाम होणे मुळीच शक्य नव्हते.