भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 66

भिक्षुसंघाचा साधेपणा

भगवंताला इतर संघात चालू असलेली तपश्चर्या मुळीच पसंत नव्हती, तथापि आपल्या संघातील भिक्षूंनी अत्यंत साधेपणाने वागावे याबद्दल भगवान फार काळजी घेत असे, भिक्षू जर परिगृही बनले तर ते आपल्या परिग्रहासह चारी दिशांना जाऊन प्रचारकार्य कसे करू शकतील? सामञ्ञफलसुत्तांत भगवान बुद्ध अजातशत्रू राजा म्हणतो, सेय्यथापि महाराज पक्खी सकुणो येन येनेव डेति सपत्तभारी व डेति। एकमेव महाराज भिक्खु संतुट्ठी होती, यपरिहारिकेन चीबरेन, चुच्छिपरिहारिकेन पण्डपतेन। सो येन येनेव पक्कमति समादायेव पक्कमति।

‘हे महाराज, जसा एखादा पक्षी ज्या दिशेला उडतो त्या त्या दिशेला आपल्या पंखासहच उडतो, त्याचप्रमाणे हे महाराज, भिक्षु शरीराला लागणार्‍या चीवराने आणि पोटाला लागणार्‍या पिंडाने (भिक्षेने) संतुष्ट होतो तो ज्या ज्या दिशेला जातो, त्या त्या दिशेला आपले सामान बरोबर घेऊनच जातो.’

अशा भिक्षुजवळ फार झाले तर खालील गाथेत दिलेल्या आठ वस्तू असत.

तिचीवर च पत्तो च वासि सूचिच बन्धं।
परिस्सावनेन अट्टठेते यूत्तयोगस्स बिक्खुनो।।

‘तीन चीवरे, पात्र, वासि (लहानशी कुऱ्हाड), सुई, कमरबंध व पाणी गाळण्याचे फडके, या आठ वस्तू या भिक्षूला पुरे आहेत.’

वागणुकीचे नियम

याप्रमाणे भिक्षूंनी अत्यंत साधेपणाने वागावे असा बुद्ध भगवंताचा उपदेश होता. तथापि मनुष्यस्वभावाला अनुसरून काही भिक्षु या वस्तू स्वीकारण्यात देखील अतिरेक करीत; म्हणजे तीन चीवरापेक्षा जास्त वस्त्रे घेत; मातीचे किंवा लोखंडाचे पात्र ठेवण्याऐवजी तांब्यापितळेचे पात्र स्वीकारीत; चीवरे प्रमाणाबाहेर मोठी बनवीत. येणेकरून परिग्रहाला वाव मिळत असे. वास्तव याला आळा घालण्यासाठी पुष्कळसे नियम करावे लागले. अशा नियमांची संख्या बरीच मोठी आहे.

विनयपिटकांत भिक्षूंसंघासाठी एकंदरीत २२७ निषेधात्मक नियम दिले आहेत. त्यांना ‘पातिमोक्ख’ असे म्हणतात. त्यापैकी दोन अनियत (अनियमित) आणि शेवटचे ७५ सेखिय, म्हणजे खाण्यापिण्यात, चालण्याबोलण्यात शिष्टाचाराने कसे वागावे. या संबंधाचे नियम आहेत. एवढे वजा जाता की १५० नियमानांच अशोककालाच्या सुमाराला पतिमोक्ख म्हणत असेत, असे वाटते. त्या कालापूर्वी हे सर्व नियम अस्तित्वात नव्हते; आणि जे हे त्यात मूलभूत नियम सोडून बाकी नियमांत योग्य फेरफार करण्याचा संघाला पूर्णपणे अधिकार होता. परिनिर्वाण पावण्यापूर्वी भगवान आनंदाला म्हणतो, “हे आनंदा, जर संघाची इच्छा असेल तर माझ्या पश्चात संघाने बारीकसारीक नियम गाळावे.” यावरून बारीकसारीक नियम गाळण्याला किंवा देशकालानुसार सामान्य नियमांत फेरफार करण्याला भगवंताने संघाला पूर्णपणे मुभा दिली होती, हे स्पष्ट होते.