भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 60

पंचवर्गीय भिक्षुसंघ

गोतम बोधिसत्त्व बुद्ध होऊन वाराणसीला ऋषिपत्तनात आला तेव्हा त्या पंचवर्गीय भिक्षूंनी त्याचा आदरसत्कार देखील करू नये असा बेत केला होता, इत्यादिक मजकूर पाचव्या प्रकरणात आलाच आहे. अखेरीस या पंचवर्गीयांनी बोधिसत्त्वाचा धर्ममार्ग ऐकून घेतला आणि त्या प्रसंगी एका तेवढ्या कौण्डिन्याने आपली संमति दर्शवलि. तेव्हा बुद्ध भगवान उद्गारला, ‘‘कौण्डिन्याने जाणले (अञ्ञासि वत भो कौण्डञ्ञो).’’ त्यामुळे कौण्डिन्याला ‘अञ्ञासि कौण्डञ्ञ (अज्ञात कौण्डिन्य)’ हेच नाव पडले. आणि ह्य़ा एकाच गोष्टीवरून बौद्ध वाङ्मयात कौण्डिन्याला प्रसिद्ध स्थान मिळाले. ह्यानंतर त्याने कोणतीही महत्त्वाची कामगिरी केल्याचा उल्लेख मुळीच सापडत नाही. प्रथमत: त्याने एकट्यानेच बुद्धाच्या नवीन धर्ममार्गाचे अभिनंदन केले, हाच त्याचा पुरुषार्थ समजला पाहिजे.

तदनंतर बुद्ध भगवंताने वप्प (बाष्प) आणि भद्दिय (भद्रिक) या दोघांची समजूत घातली. आणि काही दिवसांनी त्यांना देखील या नवीन धर्ममार्गाचा बोध झाला. नंतर काही काळाने महानाम व अस्सजि (अश्वजित) यांना या नवीन धर्ममार्गाचा बोध झाला. आणि हे पंचवर्गीय भिक्षु बुद्धाचे एकनिष्ठ भक्त झाले. या कामी किती वेळ गेला याचा कोठे उल्लेख नाही. पण पंचवर्गीय भिक्षु प्रथमत: बुद्धाचे शिष्य झाले, आणि या पाचांचा भिक्षुसंघ बनला, याबद्दल सुत्तपिटकाची आणि विनयपिटकाची एकवाक्यता आहे.

यश आणि त्याचे साथी

पंचवर्गीयांबरोबर बुद्ध भगवान् ऋषिपत्तनात राहत असता त्याला आणखी ५५ भिक्षु कसे मिळाले आणि त्या चातुर्मासानंतर भगवंताने राजगृहापर्यंत प्रवास करून भिक्षुसंघात केवढी मोठी भर घातली याचे वर्णन महावग्गात सापडते. त्याचा सारांश येथे देत आहे.

वाराणसीत यश नावाचा एक सुसंपन्न तरुण राहत होता. एकाएकी प्रपंचातून त्याचे मन उठले आणि शांत स्थानाचा शोध करीत तो ऋषिपत्तनात आला. बुद्धाने धर्मोपदेश करून त्याला आपल्या संघात दाखल करून घेतले. त्याच्या शोधासाठी त्याचे आईबाप आले. त्यांना बुद्धाने उपदेश केला आणि ते देखील बुद्धाचे उपासक झाले.

यक्ष भिक्षु होऊन बुद्धाच्या संघांत दाखल झाला, हे वर्तमान वाराणसी नगरात राहणार्‍या त्याच्या विमल, सुबाहु पुण्णजि (पूर्णजित) आणि गवंपति (गवांपति) ह्या चार मित्रांना समजले आणि ऋषिपत्तनात येऊन ते देखील बुद्धाच्या भिक्षुसंघात प्रविष्ट झाले. त्या सर्वाचे पन्नास तरुण मित्र होते. त्यांनी ऋषिपत्तनात येऊन बुद्धोपदेश ऐकला आणि आपल्या मित्रांप्रमाणेच संघात प्रवेश केला. याप्रमाणे साठ भिक्षूंचा संघ ऋषिपत्तनांत गोळा झाला.

बहुजनहितासाठी धर्मप्रचार

चातुर्मासाच्या शेवटी बुद्ध भगवान् या आपल्या भिक्षुसंघास म्हणाला, ‘‘भिक्षुहो, प्रापंचिक आणि स्वर्गीय पाशातून मी मुक्त झालो आहे, आणि तुम्ही देखील या पाशातून मुक्त झाला आहा. तेव्हा आता, भिक्षु हो, बहुजनांच्या हितासाठी, सुखासाठी, लोकांवर अनुकंपा करण्यासाठी, देवांच्या आणि मनुष्यांच्या कल्याणासाठी, धर्मोपदेश करण्यास प्रवृत्त व्हा. एका मार्गाने दोघे जाऊ नका. प्रश्नरंभी कल्याणप्रद, मध्यंतरी कल्याणप्रद आणि शेवटी कल्याणप्रद अशा या धर्ममार्गाचा लोकांना उपदेश करा.’’

याप्रमाणे बुद्ध भगवंताने आपल्या साठ भिक्षूंस चारी दिशांना पाठविले. ते इतर तरुणांना भगवंतापाशी आणीत आणि भगवान् त्यांना प्रव्रज्या देऊन आपल्या भिक्षुसंघात दाखल करून घेत असे. पण त्या कामी साठ भिक्षूंना व तरुण उमेदवारांना त्रास पडू लागला; म्हणून परस्परच प्रव्रज्या देऊन आपल्या संघात दाखल करून घेण्याला त्याने भिक्षूंना परवानगी दिली व तो स्वत: उरुवेलेकडे जाण्यास निघाला.