भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 47

उरुवेलेला आगमन

राजगृहाहून बोधिसत्त्व उरुवेलेला आला आणि तपश्चर्या करण्यासाठी हे स्थान त्याने पसंत केले. त्याचे वर्णन अरियपरियेसन सुत्तात सापडले. भगवान म्हणतो, “भिक्षुहो, तो मी कुशल कोणते हे जाणण्याच्या हेतूने लोकोत्तर शांतीच्या श्रेष्ठ स्थानाचा शोध करीत क्रमश: प्रवास करून उरुवेला येथे सेनानिगमाला आलो, तेथे मी रमणीय भूमिभाग पाहिला. त्यात सुशोभित वन असून नदी मंद मंद वाहत होती. तिच्या दोन्ही बाजूला सर्वत्र वाळवंट व उतार सोपा, आणि ती अत्यंत रमणीय. या वनाच्या चारी बाजूंना भिक्षाटन करण्यासाठी गाव दिसले. हा रमणीय भूमिभाग असल्यामुळे कुलीन मनुष्याला तपश्चर्या करण्याला योग्य वाटून मी त्याच ठिकाणी तपश्चर्या चालविली.”

राजगृहाच्या सभोवती ज्या टेकड्या आहेत त्याच्यावर निर्ग्रंथ वगैरे श्रमण तपश्चर्या करीत असत, असा उल्लेख बर्‍याच ठिकाणी सापडतो. पण बोधिसत्त्वाला तपश्चर्येसाठी हे रुक्ष पर्वत आवडले नाहीत, उरुवेलचा रम्य प्रदेश आवडला यावरून सृष्टिसौंदर्यावर असलेले त्याचे प्रेम व्यक्त होते.

तीन उपमा

तपश्चर्येला आरंभ करण्यापर्वी बोधिसत्त्वाला तीन उपमा सुचल्या. त्याचे वर्णन महसच्चकसुत्ता केले आहे. भगवान म्हणतो, “हे अग्गिवेस्सना एखादे ओले लाकूड पाण्यात पडलेले असले आणि एखादा मनुष्य उत्तरारणि घेऊन त्याच्यावर घासून अग्नि उत्पन्न करू लागला तर त्यापासून आग उत्पन्न होईल काय?”

सच्चक— भो गोतम, त्या लाकडापासून आग उत्पन्न होणे शक्य नाही. का की ते ओले आहे. त्या माणसाचे परिश्रम व्यर्थ जाऊन त्याला त्रास मात्र होईल.

भगवान— त्याचप्रमाणे हे अग्गिवेस्सना जे कोणी श्रमण आणि ब्राह्मण शरीराने आणि मनाने कामोपभोगापासून अलिप्त झाले नाहीत आणि ज्यांचा कामविकार शांत झाला नाही त्यांनी कितीही कष्ट भोगले तरी त्यांना ज्ञानदृष्टि आणि लोकोत्तर संबोध प्राप्त व्हावयाचा नाही. हे अग्गिवेस्सना, दुसरी मला उपमा अशी सुचली की, एखादे ओले लाकूड पाण्याहून दूर पडले आहे आणि एखादा मनुष्य उत्तररणि घासून त्यातून अग्नि उत्पन्न करण्याचा प्रयत्न करू लागला तर त्यापासून आग उत्पन्न होईल काय?
सच्चक— नाही, भो गोतम, त्याचा प्रयत्न व्यर्थ जाऊन त्याला त्रास मात्र होईल. का की हे लकूड ओले आहे.

भगवान— त्याचप्रमाणे हे अग्गिवेस्सना जे श्रमण आणि ब्राह्मण कामोपभोग सोडून शरीराने आणि मनाने त्यापासून अलिप्त राहतात खरे, पण ज्यांच्या मनातील कामविकार शमलेले नसतात त्यांनी जरी कितीही कष्ट सोसले तरी त्यापासून त्यांना ज्ञानदृष्टि आणि लोकोत्तर संबंध प्राप्त व्हावयाचा नाही. हे अग्गिवेस्सना आणखी तिसरी एक उपमा मला सुचली. एखादे कोरडे लाकूड पाण्यापासून दूर पडले आहे, आणि एखादा मनुष्य त्याच्यावर उत्तरारणि घासून अग्नि उत्पन्न करण्याचा प्रयत्न करू लागला तर तो आग उत्पन्न करू शकेल की नाही?

सच्चक— होय, भो गोतम, कारण ते लाकूड साफ कोरडे आहे. आणि पाण्यामध्ये पडलेले नाही.
भगवान— त्याचप्रमाणे हे अग्गिवेस्सना जे श्रमणब्राह्मण कायेने आणि चित्ताने कामोपभोगापासून दूर राहतात आणि ज्यांच्या मनातील कामविकार साफ नष्ट झाले आहेत त्यीं शरीराला अत्यंत कष्ट दिले काय किंवा न दिले काय, त्यांना ज्ञानदृष्टि आणि लोकोत्तर संबोध प्राप्त होणे शक्य आहे.

ह्या तीन उपमा बोधिसत्त्वाला तपश्चर्या आरंभ करताना सुचल्या. जे श्रमणब्राह्मण यज्ञयागादिकातच समाधान मानतात. त्यांनी तशा प्रसंगी तपश्चर्या करून शरीराला कष्ट दिले तरी त्यांना तत्त्वबोध व्हावयाचा नाही. दुसरे श्रमण ब्राह्मण यज्ञयागाचा मार्ग सोडून देऊन जंगलात जाऊन राहिले, पण जर त्यांच्या अंत:करणातील कामविकार नष्ट झाले नाहीत तर त्यांच्या तपश्चर्येपासून काही निष्पन्न होणार नाही. ओल्या लाकडावर उत्तरारणि घासून अग्नि उत्पन्न करण्याप्रमाणे त्यांचा प्रयत्न व्यर्थ जाणार. पण जर एखादा माणूस कामोपभोगापासून दूर राहून मनातील कामविकार साफ नष्ट करू शकला तर त्याला देहदंडावाचून तत्त्वबोध करून घेता येईल.