भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 37

मायादेवीची माहिती

बोधिसत्त्वाच्या आईची माहिती फारच थोडी मिळते. तिचे नाव मायादेवी होते, यात शंका नाही. पण शुद्धोदनाचे लग्न कोणत्या वयात झाले आणि मायादेवी बोधिसत्त्वाला कोणत्या वयात प्रवसली, इत्यादि गोष्टींची माहिती कोठेच सापडत नाही. अपदान ग्रंथात महाप्रजापती गोतमीचे एक अपदान आहे. त्यात ती म्हणते—

पच्छिमे च भवे दानि जाता देवदहे पुरे।
पिता अञ्जनसक्को मे माता सुलक्खणा।।
ततो कपिलवत्थुस्मि शुद्धोदनघरं गता।

‘आणि या शेवटल्या जन्मी मी देवदह नगरात जन्मले. माझा पिता अञ्जन शाक्य, आणि  माझी माता सुलक्षणा, नंतर (वयात आल्यावर) मी कपिलवस्तूला शुद्धोदनाच्या घरी गेले. (म्हणजे शुद्धोदनाबरोबर माझे लग्न झाले.)’
या गोतमीच्या म्हणण्यात कितपत तथ्य आहे हे सांगता येत नाही. ‘कपिलवस्तूला शुद्धोदनच्या घरी गेले’ हे म्हणणे वर दिलेल्या विवेचनाशी जुळत नाही.* पण ज्या अर्थी अञ्जनशाक्याची आणि सुलक्षणेची आणि सुलक्षणेची ही मुलगी होती. ह्या म्हणण्याला बाध येईल असा मजकूर कोठेच सापडला नाही. त्या अर्थी ती व तिची वडील बहीण मायादेवी अञ्जनशाक्याच्या मुली होत्या व त्या दोघींचीही लग्न शुद्धोदनाबरोबर झाली. असे म्हणण्यास हरकत नाही. पण ती लग्ने एकदम झाली की कालान्तराने झाली हे समजण्यास मार्ग नाही.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*कारण भरण्डूच्या कथेवरून शुद्धोदन कपिलवस्तूत राहत नव्हता असे ठरते.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बोधिसत्त्व जन्मल्यावर सातव्या दिवशी मायादेवी परलोकवासी झाली. ही गोष्ट बौद्धवाङमयात सुप्रसिद्ध आहे. त्यानंतर बोधिसत्त्वाची हयगय होऊ लागल्याकारणाने शुद्धोदनाने मायादेवीच्या धाकटया बहिणीशी लग्न केले असावे हे विशेष संभवनीय दिसते.

एवढे खरे की गोतमीने बोधिसत्त्वाचे लालनपालन आईप्रमाणे अत्यंत प्रेमाने केले. त्याला खर्‍या आईची कधीच वाण भासली नसावी.

बोधिसत्त्वाचा जन्म

“मायादेवी दहा महिन्याची गरोदर होती. तेव्हा ते माहेरी जाण्याची इच्छा प्रदर्शित केली. शुद्धोदन राजाने तिची इच्छा जाणून कपिलवस्तूपासून देवदह नगरापर्यंत सर्व मार्ग साफसूफ करून ध्वजपतकादिकांनी शृंगारला, आणि तिची सोन्याच्या पालखीतून मोठ्या लवाजम्यासह माहेरी रवानगी केली. तिकडे जात असता वाटेत लुम्बिनीवनात ती एका शालवृक्षाखाली प्रसूत झाली.” हा जातकाच्या निदानकथेतील वर्णनाचा सारांश. शुद्धोदन राजा जर एक सामान्य जमीनदार होता तर तो एवढा सगळा मार्ग शृंगारू शकेल हे संभवनीय नाही, दुसरे हे की, दश मास पूर्ण झाल्यावर गरोदर स्त्रीला कोणीही माहेरी पाठविणार नाहीत. तेव्हा या गोष्टीत फारच अल्प तथ्य आहे असे दिसते.
महापदानसुत्ता बोधिसत्त्व मातेच्या उदरात प्रवेश करतो. तिथपासून जन्मल्यानंतर सात दिवसांचा होईपर्यंत एकंदरीत सोळा लोकोत्तर विशेष (धम्मता) घडून येतात असे वर्णिले आहे. त्यापैकी (९) बोधिसत्त्वाची आई दहा महिने पूर्ण झाल्यावरच प्रसूत होते. (१०) ती उभी असताना प्रसूत होते आणि (८) बोधिसत्त्व जन्मल्यावर सात दिवसांनी मरण पावते. हे तीन लोकोत्तर विशेष गोतम बोधिसत्त्वाच्या आयुष्यातून घेतले असावेत. बाकीचे सर्व काल्पनिक असून हळूहळू त्यांचाही प्रवेश गोतमाच्या चरित्रात झाला असे दिसते. सारांश बोधिसत्त्वाची माता उभी असताना प्रसूत झाली आणि त्याच्या जन्मानंतर सात दिवसांनी निवर्तली असे गृहीत धरून चालण्यास हरकत नाही. जातकाच्या निदानकथेत ती शालवृक्षाखाली प्रसूत झाली आणि ललितविस्तारात प्लक्ष वृक्षाखाली झाली असे वर्णन आहे. लुम्बिनी गावात शुद्धोदनाच्या घरी बाहेर बगीच्यात फिरत असता ती प्रसूत झाली मग ती साल वृक्षाखाली असो किंवा प्लक्ष वृक्षाखाली असो. मात्र उभी असताना प्रसूत झाली, एवढेच ह्या वर्णनात तथ्य आहे, असे समजावे.