भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


प्रकरण एक ते बारा 35

भरण्डू कालाम-सुत्तावरून होणारा उलगडा

या सुत्ताचे समग्र भाषांतर येथे दिले आहे. त्यावरून बुद्धचरित्रातील दोन तीन गोष्टींचा चांगला उलगडा होतो. त्यात पहली ही की, बुद्ध झाल्यानंतर भगवान गोतम मोठ्या भिक्षुसंघासह कपिलवस्तूला आला नाही, आणि त्याचा शाक्यांनी बहुमान केला नाही. तो एकाकी आत्मा आणि त्याच्यासाठी योग्य जागा शोधण्याला महानामाला मोठा त्रास पडला. शुद्धोदन राजाने जर बोधिसत्त्वासाठी तीन प्रासाद बांधले होते, तर त्यापैकी एक खाली करून बुद्धाला का देण्यात आला नाही? शाक्यांचे कपिलवस्तूमध्ये एक संस्थागार (म्हणजे नगर-मंदिर) असल्याचा उल्लेख अनेक ठिकाणी सापडतो. बुद्धाच्या उतार वयात शाक्यांनी हे सस्थागार पुन: बांधले आणि त्यात प्रथमत: बुद्धाला भिक्षुसंघासह एक रात्र राहावयास विनंती करून धर्मोपदेश करावयास लावले.* पण वरच्या प्रसंगी बुद्धाला त्या संस्थागारात राहण्यास मिळाले नाही. म्हणजे बुद्ध शाक्यांपैकी एक सामान्य तरुण असून त्याची कपिलवस्तूत फारशी महती नव्हती असे दिसते.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*सळायतन संयुत्त आसीविसवग्ग, सुत्त 6 पाहा.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
दुसरी गोष्ट ही की, गोतमाने गृहत्याग करण्यापूर्वी कपिलवस्तूमध्ये हा कालमाचा आश्रम अस्तित्वात होता. कालामाचा धर्म जाणण्यासाठी त्याला मगधाच्या राजगृहापर्यंत प्रवास करण्याची मुळीत आवश्यकता नव्हती. कालामाचे तत्त्वज्ञान तो कपिलवस्तूमध्ये शिकला, हे या सुत्तावरून सिद्ध होते.

तिसरी गोष्ट ही की, महानाम शाक्य बुद्धाचा चुलतभाऊ असता तर त्याची व्यवस्था त्याने भरण्डू कालमाच्या आश्रमात न करता आपल्या घराशेजारी कोठे तरी प्रशस्त जागी केली असती. श्रमण गुहस्थाच्या घरी तीन दिवसांपेक्षा जास्त राहत नसत. येथे तर एका रात्रीपुरतीच राहण्याची व्यवस्था पाहिजे होती आणि ती देखील महानामाला आपल्या घरी किंवा आपल्या अतिथिगृहात करता आली नाही. एक तर महानामाचे घर गदीच लहान असावे किंवा बुद्धाला एक रात्र आश्रय देण्याचे त्याला कारण वाटले नसावे.

या सर्व गोष्टींचा विचार केला असता असे वाटते की, महानाम शाक्य आणि भगवान बुद्ध यांचा फार निकट संबंध नव्हता. आणि शुद्धोदन शाक्य तर कपिलवस्तूहून चौदा मैलांच्या अंतरावर राहत होता. त्याचा आणि कपिलवस्तूचा फार थोडा संबंध असावा. शाक्यांची सभा भरली तरच तो कपिलवस्तूला जात असावा.

भद्दिय राजाची कथा

महापदानसुत्ता शुद्धोदनाला राजा म्हटले असून त्याची राजधानी कपिलवस्तू होती असे म्हटले आहे. परंतु विनयपिटकातील चुल्लवग्गात जी भद्दियांची कथा आली आहे तिचा या विधानाशी पूर्णपणे विरोध येतो.

अनुरुद्धाचा थोरल भाऊ महानाम पित्याच्या मरणानंतर घरची सर्व व्यवस्था पाहत असे अनरुद्धाला प्रपंचाची माहिती मुळीच नव्हती. बुद्ध भगवंताची सर्वत्र प्रसिद्धी झाल्यावर थोर थोर शाक्य कुळातील तरुण भिक्षू होऊन त्याच्या संघात प्रवेश करू लागले. हे पाहून महानाम अनुरुद्धाला म्हणाला, “आमच्या कुळातून एकही भिक्षु झाला नाही, तेव्हा तू तरी
म्हणाला, “मला भिक्षू हो, किंवा मी तरी भिक्षु होतो.” अनुरुद्ध म्हणाला. "मला  हे काम झेपणार नाही, तुम्हीच भिक्षु व्हा.”

महानामाने ही गोष्ट कबूल केली व धाकट्या भावाला तो प्रपंचाची माहिती करून देऊ लागला. तो म्हणाला, “प्रथमत: शेत नांगरले पाहिजे. नंतर पेरणी केली पाहिजे. त्यानंतर त्या कालव्याचे पाणी द्यावे लागते. पाणी बाहेर काढून त्याची खुरपणी करतात आणि ते पिकले म्हणजे कापणी करावी लागते.”

अनुरुद्ध म्हणाला, “ही खटपट फारच मोठी दिसते. घरचा व्यवहार तुम्हीच सांभाळा. मी भिक्षु होतो.” पण या कामी त्याला आपल्या आईची संमति मिळेना आणि तो तर हट्ट धरून बसला. तेव्हा ती म्हणाली, “शाक्यांचा राजा भद्दिय जर तुझ्याबरोबर भिक्षु होत असेल तर मी तुला भिक्षु होण्यास परवानगी देते.”

भद्दिय राजा अनुरुद्धाचा मित्र होता. पण तो राज्यपद सोडून भिक्षु होणार नाही, असे अनुरुद्धाच्या आईला वाटले आणि म्हणूनच तिने ही अट घातली, अनुरुद्ध आपल्या मित्राजवळ जाऊन त्यालाही भिक्षु होण्यास आग्रह करू लागला. तेव्हा भद्दिय म्हणाला, “तू सात वर्षे थांब, मग आपण भिक्षु होऊ.” पण इतकी वर्षे अनुरुद्ध वाट पाहण्याला तयार नव्हता. सहा वर्षे, पाच वर्षे, चार वर्षे, तीन, दोन, एक वर्ष, सात महिने, असे करता करता भद्दिय सात दिवसांनी अनुरुद्धाबरोबर जाण्यास कबूल झाला. आणि सात दिवसानंतर भद्दिय, अनुरुद्ध, आनंद, भगु, किम्बिल व देवदत्त हे सहा शाक्यपुत्र आणि त्यांच्याबरोबर उपलि नावाचा न्हावी असे सात असामी चतुरगिनी सेना सज्ज करून त्या सेनेसह कपिलवस्तूपासून दूर अंतरावर गेले. व तेथून सैन्य मागे फिरवून त्यांनी शाक्य देशाची सीमा उल्लंघिली. त्या वेळी भगवान मल्लाच्या अनुप्रिय नावाच्या गावी राहत होता. तेथे जाऊन या सात असामींनी प्रव्रज्या घेतली.