भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


**प्रस्तावना 5

‘विनयसमुकसे’ हेच धम्मचक्कपवत्तनसुत्त आहे असे गृहीत धरले, तर भाब्रू शिलालेखात निर्देशिलेले सात उपदेश बौद्ध वाङ्मयात सापडतात, ते येणेप्रमाणे:-

(१) विनयसमुकसे = धम्मचक्कपवत्तनसुत्त
(२) अलियवसानि = अरियवंसा (अंगुत्तर चतुक्कनिपात)
(३) अनागतभयानि = अनागतभयानि (अंगुत्तर पञ्चकानिपात)
(४) मुनिगाथा = मुनिसुत्त (सुत्तनिपात)
(५) मोनेयसूते = नाळकसुत्त (सुत्तनिपात)
(६) उपतिसपसिने = सारिपुत्तसुत्त (सुत्तनिपात)
(७) लाघुलोवाद = राहुलोवाद (मज्झिम, सुत्त नं.६१).

या सातांपैकी धम्मचक्कपवत्तन जिकडेतिकडे सापडते. तेव्हा त्याचे महत्त्व विशेष आहे हे सांगावयालाच नको; आणि त्याप्रमाणे ते अशोकाने अग्रभागी दिले आहे. बाकीच्यांपैकी तीन एका लहानशा सुत्तनिपातात आहेत. त्यावरून सुत्तनिपाताचे प्राचीनत्व सिद्ध होते. त्याच्या शेवटल्या दोन वग्गांवर व खग्गविसाणसुत्तावर निद्देस नावाची विस्तृत टीका असून तिचा समावेश ह्याच खुद्दकनिकायात करण्यात आला आहे. सुत्तनिपाताचे हे भाग निद्देसापूर्वी एकदोन शतके तरी अस्तित्त्वात होते असे समजले पाहिजे, आणि त्यावरून देखील सुत्तनिपाताचे प्राचीनत्व सिद्ध होते. त्यात सर्वच सुत्ते अतिप्राचीन असतील असे नव्हे. तथापि बहुतेक सुत्ते नि:संशय फार जुनी आहेत. प्रस्तुत ग्रंथात बुद्धचरित्रासंबंधाने किंवा बुद्धाच्या उपदेशासंबंधाने जी चर्चा करण्यात आली आहे ती अशाच प्राचीन सुत्तांच्या आधाराने.

आता आपण खास बुद्धचरित्राकडे वळू. त्रिपिटकात एकाच ठिकाणी सबंध बुद्धचरित्र नाही. ते जातकट्ठकथेच्या निदानकथेत सापडते. ही अट्ठकथा बुद्धघोषाच्या समकाली म्हणजे पाचव्या शतकात लिहिली असली पाहिजे. त्याच्यापूर्वी ज्या सिंहली अट्ठकथा होत्या त्यातील बराच मजकूर ह्या अट्ठकथेत आला आहे. हे बुद्धचरित्र मुख्यत्वे ललितविस्तराच्या आधारे लिहिले आहे. ललितविस्तर इसवी सनाच्या पहिल्या शतकात किंवा त्यापूर्वी काही वर्षे लिहिला असावा. तो महायानाचा ग्रंथ आहे; आणि त्यावरूनच जातकट्ठकथाकाराने आपली बुद्धचरित्राची कथा रचली आहे. ललितविस्तर देखील दीघनिकायातील महापदानसुत्ताच्या आधारे रचला आहे. त्या सुत्तात विपस्सी बुद्धाचे चरित्र फार विस्ताराने दिले आहे; आणि त्या चरित्रावरून ललितविस्तरकाराने आपले पुराण रचले. अशा रीतीने गोतम बुद्धाच्या चरित्रात भलत्याच गोष्टी शिरल्या.

महापदानसुत्तातील काही भाग निराळे काढून ते गोतमबुद्धाच्या चरित्राला सुत्तपिटकातच लागू केलेले दिसून येतात. उदाहरणार्थ, तीन प्रासादांची गोष्ट घ्या. विपस्सी राजकुमाराला राहण्यासाठी तीन राजवाडे होते, या कथेवरून गोतमबुद्धाला राहण्यासाठी तसेच प्रासाद असले पाहिजेत, अशी कल्पना करून गोतमबुद्धाच्या तोंडीच असा मजकूर घातला आहे की, त्याला राहण्याला तीन प्रासाद होते; आणि तो त्या प्रश्नसादात अत्यंत चैनीने राहत असे. ह्या कथेची असंभवनीयता मी दाखवून दिलीच आहे (पृष्ठ ६२). परंतु ती कथा अंगुत्तरनिकायात आली आहे, आणि त्याच निकायात अशोकाच्या भाब्रू शिलालेखातील दोन सुत्ते येतात. तेव्हा मला ती कथा एके काळी ऐतिहासिक भासली. पण विचारान्ती असे दिसून आले की ह्य़ा अंगुत्तरनिकायात पुष्कळ भाग मागाहून घातले आहेत. तीन वस्तूसंबंधाने ज्या गोष्टी असतील त्यांचा तिकनिपातात संग्रह केला. त्यात अर्वाचीनतेचा आणि प्राचीनतेचा विचार करण्यात आलेला दिसत नाही. (महापदान सुत्तातील विपस्सी बुद्धाच्या दन्तकथा गोतमबुद्धाच्या चरित्रात खण्डश: कशा शिरल्या व त्यांपैकी सुत्तपिटकात कोणत्या सापडतात, हे पहिल्या परिशिष्टात पाहावे.)

अशा कथांतून बुद्धचरित्रासंबंधाने विश्वसनीय गोष्टी कशा काढता येतील, हे दाखविण्याच्या उद्देशानेच मी हे पुस्तक लिहिले आहे. अशा काही उपयुक्त गोष्टी माझ्या दृष्टोत्पत्तीला आल्या नसतील; आणि ज्या काही गोष्टींना महत्त्व देऊ नये त्यांना माझ्याकडून महत्त्व दिले गेले असेल. पण संशोधन करण्याच्या पद्धतीत माझी चूक असेल, असे मला वाटत नाही. ह्या पद्धतीचा अवलंब केल्यास बुद्धचरित्रावर आणि त्या काळच्या इतिहासावर विशेष प्रकाश पडेल, असा मला भरवसा वाटतो; आणि त्याच उद्देशाने मी हे पुस्तक लिहिले आहे. यातील काही लेख काही वर्षामागे ‘पुरातत्त्व’ नावाच्या त्रैमासिकात आणि ‘विविधज्ञानाविस्तारा’त छापले होते. पण ते जशाचे तसे या पुस्तकात घेतले नाहीत. त्यात पुष्कळच फेरफार केला आहे. त्यातला बराच मजकूर या पुस्तकात दाखल केला असला, तरी हे पुस्तक अगदी स्वतंत्र आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.