भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


**प्रस्तावना 4

अशोकाच्या भाब्रू शिलालेखात खालील सात बुद्धोपदेश भिक्षूंनी, भिक्षुणींनी, उपासकांनी आणि उपासिकांनी वारंवार ऐकावे व पाठ करावे अशी सूचना केली आहे. ते उपदेश असे:-

(१) विनयसमुकसे, (२) अलियवसानि, (३) अनागतभयानि, (४) मुनिगाथा, (५) मोनेयसूते, (६) उपतिसपसिने, (७) लाघुलोवादे मुसावादं अधिगिच्य भगवता बुद्धेन भासिते.

या सातांपैकी नं. ७ मज्झिमनिकायातील राहुलोवाद सुत्त (नं. ६१) आहे असे ओल्डेनबर्ग आणि सेनार या दोन पाश्चात्य विद्वानांनी दाखवून दिले. बाकीच्यांची माहिती देण्याचा प्रयत्न प्रो. ऱ्हिस डेविड्स यांनी केला. पण सुत्तनिपातांतील मुनिसुत्त याच्याशिवाय त्यांनी जी दुसरी सुत्ते दर्शविली ती सर्व चुकीची होती. नंबर २, ३, ५ आणि ६ ही चार सुत्ते कोणती असावीत याचा ऊहापोह मी १९१२ सालच्या फेब्रुवारींच्या ‘इंडियन अँटिक्वेरी’च्या अंकात केला आहे. त्यात दर्शविलेली सुत्ते आता सर्वत्र ग्राह्य़ झाली आहेत. फक्त पहिल्या सुत्ताचा मला त्या वेळी थांग लागला नव्हता. ‘विनयसमुकसे (विनयसमुत्कर्ष) यांचा विनयग्रंथाशी काही तरी संबंध असला पाहिजे असे वाटले आणि तशा तर्‍हेचा उपदेश कोठेच न सापडल्यामुळे ते सूत्र कोणते हे मला सांगता आले नाही.’

परंतु विनय शब्दाचा अर्थ विनयग्रंथ करण्याचे काही कारण नाही. ‘अहं खो केसि पुरिसदम्मं सण्हेन पि विनेमि फरुसेन पि विनेमि।’ (अंगुत्तर चतुक्कानिपात, सुत्त नं. १११); ‘तमेनं तथागतो उत्तरिं विनेति।’ (मज्झिम, सुत्त नं. १०७). ‘यन्नूनाहं राहुलं उत्तरिं आसवानं खये विनेय्यं ति।’ (मज्झिम, सुत्त नं. १४७). इत्यादि ठिकाणी विपूर्वक नी धातूचा अर्थ शिकविणे असा आहे; आणि त्याच्यावरूनच नंतर विनयाच्या नियमांना विनयपिटक म्हणण्यात येऊ लागले. बुद्धाने ज्या वेळी भिक्षु गोळा करण्यास आरंभ केला, त्या वेळी विनयग्रंथाचे अस्तित्व मुळीच नव्हते. जी काही शिकवणूक होती ती सुत्ताच्या रूपानेच. पहिल्याप्रथम पञ्ञवर्गीय भिक्षूंना बुद्धाने आपले शिष्य केले ते ‘धम्मचक्क-पवत्तन-सुत्त’ उपदेशून. तेव्हा विनय शब्दाचा मूळचा अर्थ शिकवणूक असाच घेतला पाहिजे, आणि त्या विनयाचा समुत्कर्ष म्हणजे बुद्धाचा उत्कृष्ट धर्मोपदेश. ‘समुक्कंस’ हा शब्द जरी पालि वाङ्मयांत बुद्धोपदेशवाचक आढळत नाही, तथापि ‘सामुक्कंसिका धम्मदेसना’ हे वाक्य अनेक ठिकाणी सापडते. उदाहरणार्थ, दीघनिकायातील अम्बट्ठसुत्ताच्या शेवटी आलेला हा मजकूर पाहा- ‘‘यदा भगवा अत्र्ञासि ब्राह्मणं पोक्खरसाति कल्लचित्तं मुदुचित्तं विनीवरणचित्तं उदग्गचित्तं पसन्नचित्तं, अथ या बुद्धानं सामुक्कंसिका धम्मदेसना तं पकासेसि दुक्खं समुदयं निरोधं मग्गं।’’ (‘जेव्हा भगवंताने जाणले की पौष्करसादि ब्राह्मणाचे चित्त प्रसंगाला उचित, मृदु, आवरणांपासून विमुक्त, उदग्र आणि प्रसन्न झाले आहे, तेव्हा बुद्धाची जी सामुत्कर्षिक धर्मदेसना ती त्याने प्रकट केली. ती कोणती? तर दु:ख, दु:खसमुदय, दु:खनिरोध आणि दु:खनिरोधाचा मार्ग.’)

याच सुत्तात नव्हे, तर मज्झिमनिकायातील उपालिसुत्तासारख्या दुसर्‍या सुत्तात, आणि विनयपिटकात अनेक ठिकाणी हेच वाक्य आले आहे. फरक एवढाच की येथे हे पोक्खरसाति ब्राह्मणाला उद्देशून आहे आणि तेथे उपालि वगैरे गृहस्थांना उद्देशून आहे. यावरून विनयसमुत्कर्ष म्हणजे ही  सामुत्कर्षिका धर्मदेशना. एका काळी या चार आर्यसत्यांच्या उपदेशाला विनयसमुक्कंस म्हणत असत, यात शंका राहत नाही. ‘धम्मचक्कपवत्तन-सुत्त’ हे नाव अशोकानंतर बर्‍याच काळाने प्रचारात आले असावे. चक्रवर्ती राजाच्या कथा लोकप्रिय झाल्यानंतर बुद्धाच्या या उपदेशाला असे भपकेदार नाव देण्यात आले.