भगवान बुद्ध

गौतम बुद्धांचे चरित्र


**प्रस्तावना 1

प्रस्तावना

पालि वाङ्मयात तिपिटक (त्रिपिटक) नावाचा ग्रंथसमुदाय प्रमुख आहे. त्याचे सुत्तपिटक, विनयपिटक आणि अभिधम्मपिटक असे तीन भेद आहेत. सुत्तपिटकात बुद्धाच्या आणि त्याच्या अग्रशिष्यांच्या उपदेशाचा प्रामुख्याने संग्रह केला आहे. विनयपिटकात भिक्षूंनी कसे वागावे यासंबंधाने बुद्धाने केलेले नियम, ते करण्याची कारणे, वेळोवेळी त्यात केलेल फेरफार आणि त्यांच्यावर केलेली टीका, यांचा संग्रह केला आहे. अभिधम्मपिटकात सात प्रकरणे आहेत. त्यात बुद्धाच्या उपदेशात आलेल्या कित्येक मुद्द्यांचा ऊहापोह करण्यात आला आहे.

दीघनिकाय, मज्झिमनिकाय, संयुत्तनिकाय, अंगुत्तरनिकाय आणि खुद्दकनिकाय असे सुत्तपिटकाचे मोठे पाच विभाग आहेत. दीघनिकायात मोठमोठाल्या चौतीस सुत्तांचा संग्रह करण्यात आला आहे. दीर्घ म्हणजे मोठी (सुत्ते). त्यांचा यात संग्रह असल्यामुळे याला दीघनिकाय म्हणतात.

मज्झिमनिकायात मध्यम प्रमाणाची सुत्ते संगृहीत केली आहेत, म्हणून त्याला मज्झिम- (मध्यम)- निकाय हे नाव देण्यात आले. संयुत्तनिकायात गाथामिश्रित सुत्ते पहिल्या भागात आली आहेत आणि नंतरच्या भागात निरनिराळ्या विषयांवरील लहानमोठी सुत्ते संगृहीत केली आहेत. यामुळे याला संयुत्तनिकाय, म्हणजे मिश्रनिकाय असे नाव देण्यात आले. अंगुत्तर म्हणजे ज्यात एका एका अंगाची वाढ होत गेली तो, त्यात एकक निपातापासून एकादसक निपातापर्यंत अकरा निपातांचा संग्रह आहे. एकक निपात म्हणजे एकाच वस्तूसंबंधाने बुद्धाने उपदेशिलेली सुत्ते ज्यात आहेत तो. त्याचप्रमाणे दुक-तिक- निपात वगैरे जाणावे.

खुद्दकनिकाय म्हणजे लहान प्रकरणांचा संग्रह. त्यात पुढील पंधरा प्रकरणे येतात- खुद्दकपाठ, धम्मपद, उदान, इतिवुत्तक, सुत्तनिपात, विमानवत्थु, पेतवत्थु, थेरगाथा, थेरीगाथा, जातक, निद्देस, पटिसंभिदामग्ग, अपदान, बुद्धवंस व चरियापिटक. हा सुत्तपिटकाचा विस्तार. विनयपिटकाचे पाराजिका, पाचित्तियादि, महावग्ग, चुल्लवग्ग व परिपाठ असे पाच विभाग आहेत.

तिसरे अभिधम्मपिटक. याची धम्मसंगणि, विभंग, धातुकथा, पुग्गलपञ्ञति, कथावत्थु, यमक व पट्ठान अशी सात प्रकरणे आहेत.

बुद्धघोषाच्या समकाली म्हणजे इसवी सनाच्या सरासरी चौथ्या शतकात या सर्व ग्रंथसमुदायांतील वाक्यांना किंवा उतार्‍यांना पालि म्हणत असत. बुद्धघोषाच्या ग्रंथांत तिपिटकातील वचनांचा निर्देश ‘अयमेत्थ पालि (ही येथे पालि)’ किंवा ‘पालियं वुत्तनं (पालीत म्हटले आहे)’ अशा शब्दांनी केला आहे. पाणिनि जसा ‘छंदसि’ या शब्दाने वेदांचा आणि ‘भाषायाम्’ या शब्दाने स्वसमकालीन संस्कृत भाषेचा उल्लेख करतो, तसाच बुद्धघोषाचार्य ‘पालियं’ या शब्दाने तिपिटकातील वचनांचा आणि ‘अट्ठकथाथं’ या वचनाने त्या काळी सिंहली भाषेंत प्रचलित असलेल्या ‘अट्ठकथां’तील वाक्यांचा उल्लेख करतो.

अट्ठकथा म्हणजे अर्थसहित कथा. तिपिटकातील वाक्यांचा अर्थ सांगावयाचा व जरुर असेल तेथे एखादी गोष्टी द्यावयाची असा परिपाठ सिंहलद्वीपात होता. कालांतराने ह्या अट्ठकथा लिहून ठेवण्यात आल्या. पण त्यांत बरेच पुनरुक्तिदोष होते; आणि पुन्हा त्या सिंहलद्वीपाबाहेरील लोकांना फारशा उपयोगी पडण्याजोग्या नव्हत्या. यास्तव बुद्धघोषाचार्याने त्यांपैकी प्रमुख अट्ठकथांचे संक्षिप्त रूपांतर तिपिटकाच्या भाषेत केले. ते इतके चांगले वठले की, त्याचा मान तिपिटक ग्रंथाइतकाच होऊ लागला. (‘पालिं विय तमग्गहुं’). अर्थात त्या अट्ठकथांना देखील पालिच म्हणू लागले. खरे म्हटले तर ‘पालि’ हे भाषेचे नावच नव्हे. या भाषेचे मूळचे नाव मागधी असे आहे; आणि हे नवे नाव अशा रीतीने तिला मिळाले.